
माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात असताना “खोटी आणि बनावट” विधाने करण्यापासून रोखण्याची बांगलादेशने भारताला विनंती केल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हटले आहे.
बांगलादेशात एक हजारांहून अधिक लोक मारल्या गेलेल्या हिंसक आंदोलनानंतर हसीना गेल्या वर्षी भारताच्या आश्रयाला आल्या आहेत.
हिंसाचाराच्या ताज्या घटना
शेख हसीना यांनी बुधवारी एका ऑनलाइन भाषणात आपल्या समर्थकांना बांगलादेशमधील अंतरिम सरकारच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आणि तसेच असंवैधानिक पद्धतीने सत्ता काबीज केल्याचा त्यांनी आरोप केला.
हसीना यांच्या भाषणापूर्वी हजारो निदर्शक ढाका येथे जमले होते. हसीना यांच्या भाषणात अडथळा आणण्याच्या प्रयत्नात, आंदोलकांनी त्यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे घर पाडून त्याला आग लावली. हसीना यांचे भाषण संपल्यानंतरही हिंसाचार सुरूच होता.
बांगलादेशने नोंदवला निषेध
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील भारताच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना आपला निषेध नोंदवत एक पत्र सुपूर्द केले आणि हसीना यांच्या टिप्पण्यांबद्दल “खोल चिंता, निराशा आणि गंभीर साशंकता” व्यक्त केल्याचे मंत्रालयाच्या फेसबुक पेजवरील निवेदनात म्हटले आहे.
“त्या भारतात असल्यामुळे…मंत्रालयाने … विनंती केली … भारताने परस्पर आदर आणि समजूतदारपणाच्या भावनेने, त्यांना अशी खोटी, बनावट आणि आग लावणारी विधाने करण्यापासून रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात … ” असे त्यात म्हटले आहे.
हसीना यांच्याशी प्रयिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
भारताने केला तोडफोडीचा निषेध
भारताने बांगलादेशकडून प्राप्त झालेल्या पत्रावर भाष्य केले नसले तरी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी रहमान यांच्या घराची करण्यात आलेली नासधूस ही “विध्वंसक कृती” म्हणून निषेध केला.
“हे खेदजनक आहे … बांगला अस्मिता आणि अभिमान जपणाऱ्या स्वातंत्र्यलढ्याला महत्त्व देणाऱ्या सर्वांना बांगलादेशच्या राष्ट्रीय जाणीवेसाठी या निवासस्थानाचे महत्त्व माहीत आहे,” असे ते म्हणाले.
याच घरात रहमान यांनी 1971 मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले होते. 1975 मध्ये त्यांची आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतेकांची हत्या याच घरात करण्यात आली.
हसीना यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जतन करण्यासाठी या घराचे रूपांतर संग्रहालयात केले होते.
बांगलादेशने हसीनांना दोष दिला
“सरकारला आशा आहे की बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याच्या हेतूंसाठी भारत आपल्या भूभागाचा वापर करू देणार नाही आणि शेख हसीना यांना बोलू देणार नाही,” असे त्यात म्हटले आहे.
राजकीय कलह
ऑगस्टमध्ये हसीना भारतात पळून आल्यापासून बांगलादेश राजकीय कलहाचा सामना करत आहे, त्याचे अंतरिम सरकार सतत निषेध आणि अशांततेच्या वातावरणात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संघर्ष करत आहे.
4 हजार किलोमीटरची (2 हजार 500 मैल) सीमारेषा आणि बंगालच्या उपसागरात सागरी सीमा सामायिक करणारे भारत आणि बांगलादेश यांचे दीर्घकाळचे सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध आहेत.
1971 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धातही भारताने महत्त्वाची भूमिका बजावली ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)