अनपेक्षित परिस्थिती आणि युद्धासाठी तयार राहा : संरक्षणमंत्री

0
संरक्षणमंत्री
लखनौमधील जॉइंट-कमांडर्स परिषदेच्या अध्यक्षपदी संरक्षमंत्री राजनाथ सिंह

भारतीय सशस्त्र दलांनी शांतता टिकवून ठेवण्यासाठी युद्धसज्ज असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे उच्चस्तरीय पहिली संयुक्त कमांडर्स परिषद 4 आणि 5 सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 5 सप्टेंबर रोजी या परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष तसेच  बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत, संरक्षण मंत्र्यांनी कमांडर्सना याचे  विश्लेषण करण्याचे, भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या “अनपेक्षित” समस्यांचा अंदाज बांधण्याचे आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
राजनाथ सिंह म्हणाले की, भारत एक शांतताप्रेमी राष्ट्र आहे आणि शांतता कायम राखण्यासाठी सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज असणे आवश्यक आहे.संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करणे आणि भविष्यातील युद्धांमध्ये देशाला भेडसावू शकणाऱ्या कुठल्याही आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने  तयारी करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
संरक्षणमंत्र्यांनी पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेली चार वर्षं चीनसोबत सुरू असणाऱ्या सीमावादाचाही उल्लेख केला आणि परिस्थितीचे सखोल विश्लेषण करण्याचे आवाहन केले.
“जागतिक अस्थिरता असूनही,भारत दुर्मिळ शांतता अनुभवत  आहे आणि शांततेने विकसित होत आहे. मात्र, वाढत्या आव्हानांमुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे.”
“अमृतकाळात आपण आपली शांतता अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करून ,आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यासोबतच भविष्यवेधी असण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.”
“यासाठी आपल्याकडे एक मजबूत आणि ठोस राष्ट्रीय सुरक्षा घटक असायला हवा. आपल्याकडे चोख प्रतिबंधात्मक यंत्रणा असायला हवी,” असे  राजनाथ सिंह म्हणाले.
कमांडर्सनी सशस्त्र दलाच्या शस्त्रागारात पारंपरिक आणि आधुनिक युद्धसामग्रीचा समावेश करताना आवश्यकतेनुसार त्याचा योग्य प्रमाणात त्याचा संगम साधावा, असे आवाहनही संरक्षणमंत्र्यांनी केले.
अंतराळ आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतेचा विकास आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्यंत आवश्यक असून, त्यावर अधिक भर द्यायला हवा असे ते म्हणाले.
लष्करी नेतृत्वाने डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर द्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले. “हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात थेट सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग मोठ्या प्रमाणात युद्धाची दिशा ठरवत आहे.” ते पुढे म्हणाले.
“हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात थेट सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग मोठ्या प्रमाणात युद्धाची दिशा ठरवत आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
04 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झालेल्या या परिषदेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी,  हवाई दल प्रमुख चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह प्रमुख संरक्षण अधिकारी सहभागी झाले होते.

रवी शंकर


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here