या समारंभात महासंचालक परमेश शिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) यांच्यातील चिरस्थायी भागीदारीची प्रशंसा केली आणि या सहकार्याने कोविड-19 महामारी आणि विविध भू-राजकीय अडथळ्यांसह आव्हानांचा यशस्वीपणे सामना कसा केला हे अधोरेखित केले.
ते म्हणाले, “हे जलावतरण जीएसएलची लवचिकता आणि कल्पकता दर्शवते, जी भारतीय उद्योगाच्या सहकार्याने साध्य केली गेली आहे.”
जीएसएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी शिपयार्डच्या लक्षणीय प्रगतीचा आढावा घेतला, ज्याने एकूण महसुलात 100 टक्के वाढ दाखवत 2 हजार कोटींचा टप्पा पार केला. “जीएसएलने सातत्याने आपल्या आधीच्या कामगिरीपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे, प्रगत तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण केले आहे आणि स्वदेशी क्षमता असलेल्या भारतातील आघाडीच्या जहाज निर्मात्यांपैकी एक म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी परिवर्तनशील धोरणांचा अवलंब केला आहे,” असे उपाध्याय म्हणाले.
जीएसएलच्या यशाचे श्रेय त्यांनी नाविन्यपूर्ण संशोधन आणि आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करणे आणि भारतीय तटरक्षक दलासोबतच्या गतिशील भागीदारीला दिले, ज्यामुळे देशाची परिचालन सज्जता लक्षणीयरीत्या वाढली असून सागरी सुरक्षा बळकट झाली आहे.
संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांनी 25 ऑगस्ट रोजी एफपीव्ही अदम्य आणि अक्षरसाठी पायाभरणी केली होती. गोवा शिपयार्ड लिमिटेडसाठी (जीएसएल) प्रथमच, शिपयार्डच्या अत्याधुनिक शिप लिफ्ट यंत्रणेचा वापर करून दोन्ही जहाजांचे एकाच वेळी जलावतर करण्यात आले. हा मैलाचा दगड जीएसएलच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो.