भारताच्या दमास्कस, बैरूत येथील दूतावासांचा यात सहभाग
“भारत सरकार परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. सीरियामध्ये उरलेल्या भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, “सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सीरियातील परिस्थिती संदर्भात भारताचा सल्ला
9 डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, “सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम्ही सीरियातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सीरियाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता जपण्यासाठी सर्व पक्षांनी काम करण्याची गरज आम्ही अधोरेखित करतो. आणि आम्ही शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक सीरियन नेतृत्वाखालील राजकीय प्रक्रियेचे समर्थन करतो जी सीरियन समाजातील सर्व घटकांच्या हितसंबंधांचा आणि आकांक्षांचा आदर करते. दमास्कसमधील आमचा दूतावास भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या संपर्कात आहे.”

त्याआधी 6 डिसेंबर रोजी, एमईएने नमूद केले होते की, “सीरियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना येईपर्यंत सीरियातील सगळ्या प्रकारचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो.”
सीरियातील भारतीयांसाठी हेल्पलाईन संपर्क क्रमांक
सध्या सीरियामध्ये असलेल्या भारतीयांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याची विनंती करण्यात आली आहे. आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक + 963 993385973 (व्हॉटस् ॲपवरही उपलब्ध) आहे. ईमेल आयडी ishoc.damascus@mea.gov.in देखील तितकाच महत्त्वाचा आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी शक्य तितक्या लवकर उपलब्ध असलेल्या व्यावसायिक विमानांद्वारे देशाबाहेर पडण्याचा सल्ला दिला गेला आहे. इतरांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवाव्यात.
सीरियावर सध्या हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) चे नियंत्रण आहे. एकेकाळी अल कायदाशी (एक्यू) संलग्न असलेला हा गट आहे. एचटीएसचा नेता अबू मोहम्मद अल-जालानीने एका दशकापूर्वी एक्यूशी संबंध तोडले. तेव्हापासून त्याने गटाच्या जिहादी दहशतवादी कारवायांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे.
अमिताभ रेवी