Wednesday, March 25, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi कंबोडियासोबतचा युद्धविराम करार मोडताच, थायलंडने हवाई हल्ले सुरू केले

कंबोडियासोबतचा युद्धविराम करार मोडताच, थायलंडने हवाई हल्ले सुरू केले

0
थायलंडने

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप, थायलंड आणि कंबोडियाने एकमेकांवर करताच, थायलंडने कंबोडियासोबतच्या वादग्रस्त सीमारेषेवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले, अशी माहिती थाई लष्कराने सोमवारी दिली.

उबोन रात्चाथानीमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी

थाई लष्कराच्या म्हणण्यानुसार, उबोन रात्चाथानी या पूर्वेकडील प्रांतात नव्याने चकमकी सुरू झाल्या आहेत. कंबोडियाच्या सैन्याने कथितरित्या गोळीबार सुरू केल्यानंतर, थायलंडचा एक सैनिक ठार झाला आणि चारजण जखमी झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत, थायलंडने अनेक भागातील लष्करी टार्गेट्सवर हल्ला करण्यासाठी विमानांचा वापर केला, असे लष्कराने आपल्या निवेदनात सांगितले.

कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने असा दावा केला की, “अनेक दिवसांपासूनच्या चिथावणीखोर कारवायांनंतर” थायलंडच्या सैन्याने पहाटे त्यांच्या चौक्यांवर हल्ले सुरू केले, मात्र कंबोडियान लष्कराने कोणताही प्रतिहल्ला केला नाही. दरम्यान, थायलंडने कंबोडियावर थाई नागरी वस्तींवर BM-21 रॉकेट डागल्याचा आरोप केला, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.

नाजूक शांतता करार मोडला

हा संघर्ष, जुलैमध्ये झालेल्या पाच दिवसांच्या सीमायुद्धानंतर झालेल्या नाजूक युद्धविरामाच्या गंभीर तुटणाऱ्याचा संकेत आहे. या युद्धात किमान 48 लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 3 लाख नागरिकांना विस्थापित व्हावे लागले होते. हा युद्धविराम करार मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी मध्यस्थी करून घडवून आणला होता आणि ऑक्टोबरमध्ये क्वालालंपूर येथे या शांतता करारावर स्वाक्षरी करताना ट्रम्प साक्षीदार होते.

गेल्या महिन्यात, सीमेजवळ पेरलेल्या एका भूसुरुंगामुळे एक थाई सैनिक जखमी झाला, ज्यामुळे तणाव पुन्हा वाढला. त्यानंतर थायलंडने युद्धविराम कराराची अंमलबजावणी स्थगित करण्याची घोषणा केली. कंबोडियाचे माजी पंतप्रधान हून सेन (सध्याचे नेते हून मनेट यांचे वडील) यांनी थायलंडच्या लष्करावर ‘आक्रमक’ पवित्रा घेतल्याचा आरोप केला आणि लष्कराला शिस्त पाळण्याचा इशारा दिला.

“प्रत्युत्तर देण्यासाठीची रेड लाईन आधीच निश्चित करण्यात आली आहे,” असे हून सेन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले, तसेच त्यांनी कमांडर्सना त्यांच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्याचे आणि चिथावणी देणे टाळण्याचे आवाहन केले.

स्थलांतराची प्रक्रिया सुरू

थायलंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीमेकडील चार जिल्ह्यांतून 3.85 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे, त्यापैकी 35 हजारांहून अधिक लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

या दोन आग्नेय आशियाई शेजारी देश, शतकाहून अधिक काळ त्यांच्या 817 किलोमीटर लांबीच्या सीमारेषेतील अनेक भागांवर दावा करत आहेत. फ्रान्सने 1907 मध्ये कंबोडियावर वसाहतीचे राज्य असताना, प्रथम नकाशावर दर्शविलेली ही सीमा अजूनही मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे. वारंवार झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतरही, 2011 मधील आठवडाभर चाललेल्या तोफखान्यांच्या देवाणघेवाणीसह, हे वाद वेळोवेळी हिंसक संघर्षात बदलले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)

+ posts
Previous articleअणुऊर्जेवर चालणारे पहिले मालवाहू जहाज बनवण्याची चीनची योजना
Next articleपोखरा विमानतळ: नेपाळने दाखल केला सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा खटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here