लष्कर कमांडरांच्या परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मार्गदर्शन

0

नवी दिल्ली येथे 18 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत द्वैवार्षिक उपक्रम असलेली लष्कर कमांडरची परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेच्या चौथ्या दिवशी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मार्गदर्शन केले.
या परिषदेमध्ये विद्यमान संरक्षणविषयक परिस्थिती, तटवर्ती क्षेत्रातील आणि  सीमाभागातील स्थिती आणि सध्याच्या संरक्षणविषयक बंदोबस्तविषयक आव्हानांच्या सर्व पैलूंबाबत लष्कराच्या सर्वोच्च पातळीवरील नेतृत्व विचारविनिमय करत आहेत.
तसेच या परिषदेत, संस्थात्मक पुनर्रचना, वाहतुकीची सोय, प्रशासन, मनुष्यबळ विकास, स्वदेशीकरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरण, महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा वापर आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामांचे मूल्यमापन या मुद्द्यांचा देखील ऊहापोह करण्यात येत आहे. या संबोधनापूर्वी “स्वदेशीकरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरण” करण्याच्या भारतीय लष्कराच्या योजनांविषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती देण्यात आली.
देशातील सर्वात विश्वसनीय आणि प्रेरणादायी भारतीय लष्कर असून आपल्या सीमांचे रक्षण करणे आणि दहशतवादाशी मुकाबला करणे यासह, जेव्हा गरज भासेल तेव्हा नागरी प्रशासनाला मदत करण्यात भारतीय लष्कर निभावत असलेल्या ठळक भूमिकेवर त्यांनी भर दिला.
राष्ट्र उभारणीसोबतच देशाच्या एकंदर विकासात देखील भारतीय लष्कराची महत्त्वाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. संरक्षण, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण, वैद्यकीय मदत यांच्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात लष्कर उपस्थित राहून देशाची अंतर्गत परिस्थिती स्थिर राखण्यात मदत करत आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि आपला देश यांच्या ‘संरक्षण आणि सुरक्षा’ या संकल्पनेला यशस्वीपणे पुढे घेऊन जात असल्याबद्दल त्यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांची प्रशंसा केली. प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या सध्याच्या गुंतागुंतीच्या जागतिक परिस्थितीकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आगामी काळातील युद्धांमध्ये अपारंपरिक आणि असमान युद्धस्थिती असेल. सायबर, माहिती, संपर्क, व्यापार आणि वित्त हे भविष्यातील संघर्षांचे अटळ भाग असतील. त्यामुळे, सशस्त्र दलांना त्यांच्या कार्याचे नियोजन आणि धोरणे निश्चित करताना या सर्व बाबी लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
संरक्षणमंत्र्यांनी भारतमातेसाठी प्राणार्पण केलेल्या सर्व शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी लष्कराने कार्यान्वित केलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेच्या यशाबद्दल त्यांनी लष्कराच्या जवानांचे कौतुकही केले.


Spread the love
Previous article‘वागशीर’ स्कॉर्पीन पाणबुडीचे जलावतरण
Next articleNew Zealand Deal May Put Japan Closer To ‘Five Eyes’ Intelligence Alliance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here