Saturday, March 14, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi आंध्र प्रदेशमध्ये स्वायत्त सागरी जहाजबांधणी केंद्राची सागर डिफेन्सकडून उभारणी

आंध्र प्रदेशमध्ये स्वायत्त सागरी जहाजबांधणी केंद्राची सागर डिफेन्सकडून उभारणी

0
सागर
सागर डिफेन्स इंजिनिअरिंगने आंध्र प्रदेशमध्ये जगातील पहिल्या स्वायत्त सागरी जहाजबांधणी आणि प्रणाली केंद्राची पायाभरणी केली आहे.

संरक्षण तंत्रज्ञान कंपनी सागर डिफेन्स इंजिनिअरिंगने गुरुवारी आंध्र प्रदेशातील जुव्वालादिने फिशिंग हार्बर येथे जगातील पहिल्या स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्राची पायाभरणी केली.

नेल्लोर जिल्ह्यात उभारण्यात येणारी ही सुविधा पुढील पिढीतील सागरी तंत्रज्ञानाच्या विकास आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये मानवरहित पृष्ठभागावरील जहाजे (USVs), स्वायत्त पाण्याखालील वाहने (AUVs), बुद्धिमान नेव्हिगेशन सिस्टम, सागरी सेन्सर्स, कम्युनिकेशन नेटवर्क आणि स्वायत्त ऑपरेशन्ससाठी कमांड-अँड-कंट्रोल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात 29.58 एकरवर पसरलेल्या या केंद्राला समुद्रात थेट प्रवेश असेल, ज्यामुळे जहाज बांधणी, प्रक्षेपण, चाचणी आणि त्याच ठिकाणी तैनाती शक्य होईल. वाटप केलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे 7.58 एकर जमिनीचा समावेश जलतरण क्षेत्रामध्ये होतो, तर उर्वरित जमीन हार्बर झोनमध्ये येते.

शिपयार्डमध्ये डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, ज्यामुळे जहाजे आणि शिपयार्ड पायाभूत सुविधांच्या आभासी प्रतिकृती तयार केल्या जातील, ज्यामुळे वास्तविक जगात तैनात करण्यापूर्वी कामगिरीचे अनुकरण करणे, चाचणी अपग्रेड करणे आणि डिझाइन सुधारणा करणे शक्य होईल. अधिकाऱ्यांच्या मते, अशा प्रणाली अभियंत्यांना डिझाइनविषयक समस्या लवकर शोधण्यास आणि विकास वेळ कमी करण्यास अनुमती देतात.

संशोधन आणि विकासाव्यतिरिक्त, केंद्र चाचणी, देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) आणि प्रशिक्षण सुविधा प्रदान करेल. प्रकल्पाच्या प्रगतीसोबतच 300 हून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

खाजगी क्षेत्रातील नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताच्या सागरी तंत्रज्ञान परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय तसेच आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्याने हा उपक्रम विकसित करण्यात आला आहे.

कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निकुंज पराशर म्हणाले की, या प्रकल्पाचे उद्दिष्ट भारताला स्वायत्त सागरी तंत्रज्ञानात आघाडीवर ठेवणे आहे.

“स्वायत्त सागरी जहाजबांधणी आणि प्रणाली केंद्र सागरी प्रणालींची रचना, बांधणी आणि संचालन कसे केले जाईल याच्या पुढील अध्यायाचे प्रतिनिधित्व करते”, असे पाराशर म्हणाले. जागतिक सागरी कार्ये अधिकाधिक स्वायत्ततेच्या दिशेने वाटचाल करत असताना, या सुविधेमुळे भारताला पुढील पिढीच्या मानवरहित सागरी प्रणालींची रचना, चाचणी आणि उत्पादन देशांतर्गतपणे करता येईल.”

स्मार्ट उत्पादन तंत्रज्ञान शिपयार्डच्या कामकाजाचा आधार ठरेल, असे कंपनीने सांगितले. यामध्ये स्वयंचलित वेल्डिंग, कटिंग, पेंटिंग आणि असेंब्लीसाठी रोबोटिक फॅब्रिकेशन प्रणाली; रोबोट्स आणि स्वयंचलित मार्गदर्शित वाहनांचा वापर करून स्वायत्त सामग्री हाताळणी; तसेच विशेष घटक आणि सुट्या भागांच्या जलद उत्पादनासाठी योजक उत्पादन (3 डी प्रिंटिंग) यांचा समावेश आहे.

पाराशर पुढे म्हणाले की, भारताची 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशची देशातील दुसरी सर्वात लांब किनारपट्टी असल्याने सागरी क्षेत्र आर्थिक विकास आणि किनारपट्टी सुरक्षेचे प्रमुख चालक बनू शकते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleतैवानसाठीचा अमेरिकेचा नवीन शस्त्रास्त्र करार ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापर्यंत स्थगित?
Next articleइराकमध्ये अमेरिकन लष्करी विमान कोसळून चार ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here