कॅनडातील विद्यार्थ्यांची हत्या ही ‘भयानक शोकांतिका’, भारताचा इशारा

0
कॅनडातील
भारताचे अधिकृत प्रवक्ते आणि परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव रणधीर जयस्वाल शुक्रवारी, 13 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे साप्ताहिक पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तर देताना  (एमईएच्या यूट्यूब वाहिनीचा स्क्रीनग्रॅब)

कॅनडातील तीन भारतीय विद्यार्थ्यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येचे वर्णन भारताने ‘भयानक शोकांतिका’ असे केले आहे. त्याचबरोबर परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) जाहीर केले की ओटावा येथील त्याच्या उच्चायुक्तालयाने कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांना पाठिंबा देत आहे.”कॅनडातील आपल्या नागरिकांच्या बाबतीत घडलेल्या या भयंकर घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आणि संयुक्त सचिव रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले.

ओटावा येथील भारताचे उच्चायुक्त आणि टोरंटो तसेच व्हँकुव्हर येथील वाणिज्य दूतावास शक्य ती सर्व मदत पुरवत आहेत आणि हत्यांचा सखोल तपास व्हावा यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले.

कॅनडातील भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांचे कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. उच्चायुक्त आणि वाणिज्य दूतावास भारतीय नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या नियमितपणे कॅनडाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडतात. द्वेषातून केले जाणारे गुन्हे आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करणारी सूचना जारी केली आहे,” असेही ते म्हणाले.

याशिवाय एमईएने कॅनडियन माध्यमांमधून प्रसारित झालेल्या बातम्याही फेटाळून लावल्या आहेत. जोपर्यंत खलिस्तानी समर्थक व्यक्ती फुटीरतावादी विचारांचा त्याग करत नाहीत तोपर्यंत अशा व्यक्तींना भारत व्हिसा नाकारत आहे असा आरोप या बातम्यांमध्ये करण्यात आला होता.

व्हिसा देणे हा भारताचा सार्वभौम विशेषाधिकार आहे यावर भर देत जैस्वाल म्हणाले, “भारताला बदनाम करण्याच्या कॅनडाच्या माध्यमांच्या चुकीच्या माहितीच्या मोहिमेचे हे आणखी एक उदाहरण आहे.”

‘आमची प्रादेशिक अखंडता कमकुवत करणाऱ्या व्यक्तींना व्हिसा नाकारण्याचा आम्हाला कायदेशीर अधिकार आहे. या विषयावर कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी केलेली टिप्पणी म्हणजे भारताच्या सार्वभौम कारभारात परदेशी हस्तक्षेप आहे,” असे ते म्हणाले.

खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा कॅनडा सरकारने आरोप केल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध पराकोटीचे ताणले गेले आहेत. भारताने हा दावा जोरकसपपणे नाकारला आहे.

ऐश्वर्या पारीख

 


Spread the love
Previous articleभारत-फिलीपिन्स सागरी संवादामुळे, उंचावणार भारताचे स्थान
Next articleThe Threat Of Chinese Missiles To U.S. Bases In The Indo-Pacific

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here