Saturday, August 15, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi कंबोडियाने 2 दिवसांत दुसऱ्यांदा युद्धविरामाचा भंग केल्याचा थायलंडचा आरोप

कंबोडियाने 2 दिवसांत दुसऱ्यांदा युद्धविरामाचा भंग केल्याचा थायलंडचा आरोप

0

बुधवारी, थायलंडने कंबोडियन सैन्यावर सीमारेषेवर तीन ठिकाणी युद्धविरामाचा भंग केल्याचा आरोप केला आणि यापुढे अशाप्रकारच्या चिथावणीपूर्वक कारवाया केल्यास, थाई लष्कराला अधिक कठोर प्रत्युत्तर द्यावे लागेल, असा इशाराही दिला.

दोन्ही देशांच्या सरकारने मलेशियामध्ये झालेल्या चर्चेत युद्धविराम मान्य केला होता, जो सोमवारी मध्यरात्रीपासून अंमलात देखील आणला गेला. मात्र, असे असातानाही कंबोडियाने दोन दिवसांत सलग दुसऱ्यांदा युद्धबंदींचा भंग केल्यामुळे, थायलंडने कंबोडियावर गंभीर आरोप केला आहे.

दोन्ही देशातील संघर्ष थांबवणे आणि वाढत्या हिंसाचाराला आळा घालणे, हा या युद्धविरामाचा उद्देश आहे. हा संघर्ष गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक जीवघेणा संघर्ष होता, ज्यात कमीत कमी 43 लोक ठार झाले आणि 300,000 हून अधिक नागरिक विस्थापित झाले.

हा युद्धविराम मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाला. ट्रम्प यांनी थायलंड व कंबोडियाचे नेते यांना इशारा दिला होता की जर संघर्ष सुरू राहिला, तर परिणाम भोगावे लागतील.

अमेरिकेमध्ये थायलंड आणि कंबोडियाला त्यांच्या वस्तूंवर 36% शुल्क आकारले जाते, जो त्यांच्या निर्यातीसाठी सर्वात मोठा बाजार आहे. युद्धविराम करारानंतर, ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधला आणि आपल्या व्यापार टीमला शुल्कविषयक चर्चेसाठी निर्देश दिले आहेत.

दोन्ही बाजूंनी गोळीबार

बुधवारी, थायलंडने सांगितले की, कंबोडियन सैनिकांनी थायलंडच्या ईशान्येस सिसाकेत प्रांतातील स्थानांवर गोळीबार केला.

“कंबोडियन सैन्याने हलकी शस्त्रास्त्रे आणि ग्रेनेड लाँचर वापरुन हल्ला केला, ज्यामुळे थायलंडलाही स्व-संरक्षणासाठी प्रत्युत्तर द्यावे लागले,” असे थायलंड लष्कराचे प्रवक्ते मेजर-जनरल विनथाय सुवरी यांनी पत्रकारांना सांगितले.

“हा करारानंतरचा युद्धविरामाचा भंग करण्याचा दुसरा प्रकार आहे, जो दर्शवतो की कंबोडिया युद्धबंदी कराराचा आदर करत नाही, संघर्ष कमी करण्याच्या प्रयत्नांना धोका पोहोचवतो आणि दोन्ही देशांतील विश्वासाला तडे देतो.”

कंबोडियाने हे सर्व आरोप फेटाळले असून, ते युद्धविराम पाळण्यासाठी कटिबद्ध आहेत असे सांगत त्यांनी निरीक्षकांची मागणी केली

“हे युद्धविराम उल्लंघनाचे आरोप खोटे, दिशाभूल करणारे आणि विश्वास-संवर्धन प्रक्रियेला हानी पोहोचवणारे असून, कंबोडिया त्याचा निषेध करतो,” असे कंबोडियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चुम सौनरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की, ‘सरकार स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा आणि देखरेख प्रणालीला समर्थन देत आहे.’

या युद्धविरामादरम्यान, लष्करी मुव्हमेंट्स थांबवण्याचेही करार झाले असून, त्यातून ऑगस्ट 4 रोजी कंबोडियामध्ये होणाऱ्या संरक्षण मंत्र्यांची उच्चस्तरीय लष्करी बैठक आयोजित केली जाणार आहे.

आतापर्यंत कोणत्याही जड तोफखान्याच्या गोळीबाराची नोंद झालेली नाही, पण दोन्ही बाजूंनी सैन्य माघारी घेण्याचे कुठले संकेतही मिळालेले नाहीत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleधोरणात्मक मतभेदांमुळे ट्रम्प, G20 शिखर परिषदेला गैरहजर राहण्याची शक्यता
Next articleUNSC Report Names TRF in Pahalgam Attack, Exposes Pakistan’s Terror Cover-Up