बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देशही सोडला

0
बांगलादेशच्या

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला. पाच दशकांपूर्वी बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर उसळलेल्या सर्वात भीषण हिंसाचाराच्या दरम्यान या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या हिंसाचारामुळे रविवारपासून 106हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

जनतेची प्रतिक्रिया आणि लष्कराची भूमिका

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर ‘एक्स’ वर (पूर्वीचे ट्विटर) ‘बांगलादेश आता मुक्त आहे’ यासारख्या ट्वीट्सचा ट्रेंड सुरू झाला आहे. यातून एक लक्षणीय सार्वजनिक प्रतिक्रिया बघायला मिळते, जी बांगलादेशसाठी मुक्तीची भावना किंवा एक नवीन अध्याय सूचित करते.

बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचे वक्तव्य

बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकेर उझ झमान यांनी एका टीव्ही चॅनलला केलेल्या भाषणात सांगितले की, आता लष्कराने देशाचा ताबा घेतला असून अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. पंतप्रधान हसिना यांनी देश सोडल्याची पुष्टी त्यांनी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार हसिना आपल्या बहिणीसोबत लष्करी हेलिकॉप्टरने रवाना झाल्या असून त्या पूर्वेकडील भारताच्या पश्चिम बंगाल किंवा ईशान्येच्या त्रिपुरात उतरल्या असण्याची शक्यता आहे. रॉयटर्स त्वरित या बातमीची पडताळणी करू शकले नाही.

आनंदोत्सवाबरोबरच अनागोंदीची दृश्ये

टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलेल्या दृश्यांमध्ये हजारो लोक राजधानी ढाक्याच्या रस्त्यावर उतरताना, उत्सव साजरा करताना आणि घोषणा देत असल्याचे दिसून आले. अनेकांनी हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानावर, गणभवनवर हल्ला केला आणि विजयाची चिन्हे दाखवली. निवासस्थानाच्या आत  नागरिकांची गर्दी दिसली, काही लोकांनी देशाच्या सर्वात सुरक्षित मानल्या गेलेल्या या इमारतीमधून टीव्ही संच, खुर्च्या आणि टेबल बाहेर नेले. ढाक्यातील आंदोलक हसीना यांचे वडील, स्वातंत्र्यनेते शेख मुजीबुर रहमान यांच्या मोठ्या पुतळ्यावर चढले आणि पुतळ्याची विटंबना केली.

अलीकडच्या काळातील हिंसाचार आणि निषेध

1971 मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अलीकडच्या काळात घडलेला हिंसाचार हा सर्वात गंभीर स्वरूपाचा आहे. गेल्या महिन्यात विद्यार्थी संघटनांनी सरकारी नोकऱ्यांमधील वादग्रस्त कोटा प्रणाली रद्द करण्याची मागणी केली आणि देशातील अशांतता वाढीला लागली. त्याचे परिणाम हसीना यांच्या हकालपट्टीच्या मोहिमेत प्रतिबिंबित झाले. डेली स्टार वृत्तपत्रानुसार सोमवारी जत्राबारी आणि ढाका मेडिकल कॉलेज परिसरात पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात किमान सहा जण ठार झाले. गेल्या महिन्यात झालेल्या आंदोलनात सुमारे 150 लोकांचा मृत्यू झाला.

राजकीय अस्थिरता

अशा गदारोळात विद्यमान पंतप्रधानांनी दिलेला राजीनामा ही घटना अलीकडच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. या घडामोडींमुळे देशाच्या राजकीय स्थैर्याबद्दल आणि भविष्यातील प्रशासनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. हसीना यांच्या देश सोडून जाण्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी देशात आणखी अस्थिरता आणि सत्ता संघर्षाला कारणीभूत ठरू शकते.

भविष्यातील परिणाम

शेख हसीना यांचे देश सोडून जाणे हा बांगलादेशच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अभूतपूर्व राजकीय आणि सामाजिक उलथापालथीचा हा काळ पुढे जात असताना देशाचे भविष्य सध्यातरी अधांतरी आहे. बांगलादेश आणि तेथील लोकांसाठी पुढील भविष्य निश्चित करण्यासाठी पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतील.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय समुदाय बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शेजारी देश भारत आणि प्रमुख जागतिक शक्तींसह बांगलादेशशी दृढ संबंध असलेले देश या सगळ्या घखामोडींवर सावध प्रतिक्रिया देत आहेत. दक्षिण आशियातील स्थैर्य अनेकांसाठी महत्त्वपूर्ण आहे . त्यामुळे बांगलादेशमधील अशांततेचे व्यापक प्रादेशिक परिणाम होऊ शकतात.

रेशम
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleU.S. May Build Base On Australian Island To Keep Eye On Chinese Submarines
Next articleChina Provokes, Flies UAV Along Vietnam’s Coast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here