कमी वजनाच्या ‘झोराबर’ रणगाड्याच्या वाळवंटातील प्राथमिक चाचण्या यशस्वी

0
झोराबर
हलक्या वजनाचा झोराबर रणगाडा

समुद्र सपाटीपासून अतिशय उंचावर होणाऱ्या युद्धासाठी स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या ‘झोराबर’ या वजनाने हलक्या रमगाड्याने वाळवंटातील आपल्या प्राथमिक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. बीकानेरजवळील महाजन फायरिंग रेंजमध्ये शुक्रवारी प्रथमच 25 टन वजनाच्या रणगाड्यातून बॉम्बफेक करण्यात आली. “वाळवंटी प्रदेशात आयोजित केलेल्या क्षेत्रीय चाचण्यांदरम्यान, हलक्या रणगाड्याने सर्व उद्दिष्टे कार्यक्षमतेने पूर्ण करत अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन केले. सुरुवातीच्या टप्प्यात, रणगाड्याच्यातून केल्या गेलेल्या बॉम्बफेकीच्या कामगिरीचे काटेकोरपणे मूल्यांकन केले गेले आणि त्याने निर्धारित लक्ष्यांवर आवश्यक अचूकतेने मारा केला,” असे डीआरडीओने जाहीर केले.
भारत आणि चीन या देशांमधील लष्करी संघर्षादरम्यान चीनच्या सीमेवरील पूर्व लडाख आणि अरुणाचल प्रदेशसारख्या डोंगराळ भागांमध्ये जलद तैनाती आणि उंचावरील हालचालींच्या दृष्टीने या रणगाड्याचा रचना करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या 354 हलक्या रणगाड्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डीआरडीओ आणि लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) यांनी संयुक्तपणे झोराबर प्रकल्पांतर्गत या नवीन रणगाड्याची निर्मिती केली आहे. हा रणगाडा दोन वर्षांत विकसित करण्यात आला असून गुजरातमधील एल अँड टीच्या हजीरा येथे जुलैमध्ये रणगाड्याच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले होते.

महत्त्वपूर्ण संरक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबन साध्य करण्याचे भारताचे असणारे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

हा हलका रणगाडा 2027 पर्यंत सैन्यात दाखल होण्यासाठी तयार असेल असे डीआरडीओने जाहीर केले आहे. मात्र संपूर्ण अधिग्रहण, उत्पादन आणि लष्करात तो दाखल होणे ही  प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये वाळवंट आणि उच्च उंचीच्या भागांसह अति तीव्र उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूतील विविध चाचण्यांची मालिका पार पाडावी लागेल. झोराबर प्रकल्पाला डिसेंबर 2022 मध्ये, संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने प्राथमिक मंजुरी किंवा ‘आवश्यकतेची स्वीकृती’ दिली होती. त्यासाठी अंदाजे 17 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

भारतीय लष्कराने लडाखमध्ये  रशियात बनलेले अनेक जड टी-72 आणि टी-90 रणगाडे तैनात केले आहेत. मात्र हे रणगाडे खडकाळ भूप्रदेशातील युद्धांसाठी योग्य नाहीत, कारण त्यांची निर्मिती सपाट प्रदेश आणि वाळवंटात वापरण्यासाठी करण्यात आली आहे. सीमेवरील तणाव सुरू झाल्यापासून, पुरेशा दारूगोळ्यासह, संरक्षण, पाळत ठेवणे आणि दळणवळण क्षमता असलेल्या हलक्या रणगाड्यांची गरज आहे. हलक्या रणगाड्यांची हवाई वाहतूक केली जाऊ शकते, हे रणगाडे डोंगराळ भागाप्रमाणेच वाळवंटात ही कार्य करण्यास सक्षम आहे, उंचावर असणाऱ्या लक्ष्यावर गोळीबार करू शकतात तसेच मर्यादित दारूगोळ्यासह उत्तम कामगिरी बजावू शकतात.

डॉ. रवी शंकर


+ posts
Previous articleIndian Light Tank ‘Zorawar’ Clears Preliminary Field Trials In Deserts
Next articleChina Vocal About German Navy’s Transit Of Taiwan Strait

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here