पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जाहीरपणे कबूल केले आहे की 9 आणि 10 मे रोजीच्या मध्यरात्री भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या हद्दीत केलेल्या माऱ्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला जबर धक्का बसला.
अझरबैजानमध्ये बोलताना शरीफ यांनी माध्यमांना सांगितले की, “9 आणि 10 मे रोजीच्या रात्री, आम्ही भारतीय आक्रमणाला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला होता.”
“आमची सशस्त्र दले धडा शिकवण्यासाठी फजरच्या नमाजानंतर पहाटे 4.30 वाजता कारवाई करण्यास सज्ज होती,”
“पण ती वेळ येण्यापूर्वीच, भारताने पुन्हा एकदा ब्रह्मोस क्षेपणास्त्र वापरून हल्ला केला. ज्यात रावळपिंडीतील विमानतळासह पाकिस्तानच्या विविध प्रांतांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा समावेश होता,” अशी कबुली शरीफ यांनी दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्व पुरुष आणि 25 हिंदू पर्यटक होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले.
सुरूवातीला भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले.
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा भारतीय नागरिकांना लक्ष्य केल्यानंतर आणि सीमेपलीकडून गोळीबाराला सुरूवात झाल्यामुळे, भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानी संरक्षण यंत्रणा नष्ट केल्या.
पाकिस्तानच्या आवाहनामुळे, भारताने 10 मे रोजी संघर्ष विराम लागू केला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.
दहशतवादाचा खात्मा होईपर्यंत चर्चा नाही: परराष्ट्र मंत्रालय
भारताने गुरुवारी पाकिस्तानबद्दलच्या आपल्या कठोर भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि कॅनडाने खलिस्तानी अतिरेकीपणाला ज्या पद्धतीने हाताळले आहे त्यावर तीव्र आक्षेप घेतला.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आपल्या साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये स्पष्ट केले की फुटीरतावादी शक्तींना कोणतीही राजकीय वैधता दिली जाऊ नये.
“जातीय घटकांना राजकीय जागा दिली जाऊ नये,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कॅनडामध्ये खलिस्तान मुद्द्यावरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पाकिस्तानप्रश्नी उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामाबाद दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा नाकारली आहे.
“दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत, रक्त आणि पाणी एकत्र जाऊ शकत नाही,” असे जयस्वाल यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत चर्चेच्या अलिकडच्या प्रस्तावाला उत्तर देताना म्हटले.
“आम्ही आमच्या भूमिकेबाबत अगदी स्पष्ट आणि सुसंगत आहोत. गेल्या आठवड्यातील पत्रकार परिषदेत तसेच 13 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मी हेच सांगितले होते.”
“पाकिस्तान आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत आमची भूमिका स्पष्ट आणि सुसंगत आहेत. भारत-पाकिस्तानमधील कोणताही संवाद केवळ द्विपक्षीय असावा या आमच्या भूमिकेची तुम्हाला जाणीव आहे,” असे ते म्हणाले.
जयस्वाल यांनी अधोरेखित केले की भारत वॉन्टेड दहशतवाद्यांना ताब्यात देण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यास तयार आहे, परंतु त्यापलीकडे काहीही नाही. “दहशतवादावरच, काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला देण्यात आलेल्या प्रसिद्ध दहशतवाद्यांना भारताकडे सोपवण्यासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.”
“ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही”
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर, “अजून संपलेले नाही,” याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला.
पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी अधिक तपशील न देता हा पुनरुच्चार केला.
ऑपरेशन सिंदूरवर बोलताना मोदी म्हणाले, “22 एप्रिल रोजी पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून टाकले. पश्चिम बंगालमध्ये जाणवणाऱ्या वेदना आणि संतापाची जाणीव होती. तुमचा संताप मला जाणवत होता. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचे धाडस केले. पण आमच्या शूर सैनिकांनी त्यांना त्या सिंदूरची ताकद दाखवून दिली.”
“दहशतवादाला पोसणारा देश म्हणून ओळख असणाऱ्या पाकिस्तानकडे जगाला देण्यासाठी काहीही सकारात्मक नाही. त्याच्या स्थापनेपासूनच ते दहशतवाद आणि हिंसाचाराचे प्रजनन केंद्र राहिले आहे. परंतु भारत बदलला आहे. आम्ही आता अशी भ्याड कृत्ये सहन करत नाही. आणि ऑपरेशन सिंदूर हे आमचे त्यासाठी ठाम उत्तर आहे,” असे देशाचे पंतप्रधान पुढे म्हणाले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)