जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गेल्या आठवड्यात झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांचा योग्य तो निवाडा झालाच पाहिजे, अशी भूमिका आपण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्या समोर मांडल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे.
तणाव कमी करणे
अमेरिकेने सांगितले की रुबिओ यांनी बुधवारी वेगवेगळ्या दूरध्वनी संभाषणात दोन्ही शेजारी देशांमधील तणावपूर्ण संबंधांवर चर्चा केली आणि त्यांना “तणाव कमी करण्यासाठी” एकमेकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
त्यांनी दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी भारताने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून 26 हिंदू पुरुष पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानला सहकार्य करण्याचे आवाहन केले असल्याचे परराष्ट्र विभागाने सांगितले.
‘निवाडा व्हायलाच हवा’
भारतीय परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांनी रुबिओ यांना 22 एप्रिलच्या हल्ल्यातील “गुन्हेगार, समर्थक आणि योजनाकारांचा” निवाडा व्हायलाच पाहिजे” असे सांगितले.
त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेला विनंती केली की, त्यांनी भारताला “भाषणबाजी कमी करून जबाबदारीने वागण्यासाठी” दबाव आणावा.
पहलगामचा दहशतवादी हल्ला
22 एप्रिल रोजी, पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन पठारावर जेव्हा दहशतवाद्यांनी तिथल्या पर्यटकांवर केलेल्या सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात 26 पुरुषांना, मुख्यतः हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले.
या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली आहेत. हाशिम मुसा ऊर्फ सुलेमान आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई अशी त्यांची नावे असून ते पाकिस्तानचे रहिवासी आहेत. अनंतनाग येथील आदिल हुसेन थोकर असे दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. इस्लामाबादने या हल्ल्यात आपला हात असल्याचे नाकारत तटस्थ चौकशीची मागणी केली आहे.
काश्मीर संघर्ष
मुस्लिम बहुल काश्मीरवर हिंदू बहुल भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश दावा करतात. काश्मीरप्रश्नी त्यांच्यात दोन युद्धे झाली असून नवी दिल्ली पाकिस्तानवर जम्मू आणि काश्मीरमध्ये १९८९ मध्ये सुरू झालेल्या सरकारविरोधी उठावाला पाठिंबा आणि निधी देण्याचा आरोप करत आहे, जो आता कमी झाला आहे.पाकिस्तान म्हणतो की ते “काश्मिरींच्या आत्मनिर्णयाच्या मागणीला” फक्त राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देतात.
वाढता तणाव
पहलगाम हल्ल्यानंतर जुन्या शत्रूंनी एकमेकांविरुद्ध राजनैतिक पातळीवर विविध निर्णय घेतले आहेत, भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. तर दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमान उड्डाणांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.गेला आठवडाभर दोन्ही बाजूंच्या सैन्याने सीमेवर गोळीबार केला आहे, परंतु आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे भारताने म्हटले आहे.
पाकिस्तानने टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही.
संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संघर्ष टाळण्यास सांगितले आहे. या प्रदेशातील एक प्रमुख देश असलेल्या चीनने या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते.
पीओके प्रमुखांना हवी आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची
पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची मागणी केली आणि सांगितले की त्यांचे प्रशासन तणाव वाढल्यास मानवतावादी प्रतिसाद देण्याची तयारी करत आहे.भारतीय नौदलाने महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात अनेक गोळीबार सरावांसाठी इशारे दिले. गुजरातची सीमा पाकिस्तानला लागून आहे.
या सराव इशाऱ्यांवरील टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला नौदलाने प्रतिसाद दिला नाही.
मोदींकडून पूर्ण मुभा
वाढत्या धोक्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा घेण्यात आला.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांची वेळ, लक्ष्य आणि स्वरूप ठरवण्याचे भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, यावर त्यांनी बैठकीत भर दिला.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)