एका मोठ्या घडामोडीमध्ये पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी रात्री जम्मूच्या परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला. नियंत्रण रेषेवर (LoC) शस्त्रसंधी उल्लंघनाच्या सततच्या घटनांनंतर पहिल्यांदाच ही घटना घडल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळ अनेक ठिकाणी अकारण गोळीबार केल्यानंतर हा भडका उडाला, ज्यामुळे सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्याचा हा सलग सहावा दिवस ठरला.
पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तणावात वाढ झाली आहे. या हल्ल्यात 26 नागरिक, मुख्यतः हिंदू पर्यटक ठार झाले.
परागवालमध्ये पाकिस्तानी गोळीबारानंतर सीमा सुरक्षा दलाने (BSF) परिसरात अतिरिक्त जवान तैनात केले.
भारताचे ‘त्वरित’ प्रत्युत्तर
भारतीय सैन्याने त्वरित आणि धोरणात्मक प्रतिसाद दिला, तर भूदलांनी लष्करी मोहिमांच्या महासंचालकांना (DGMO) उद्भवलेल्या परिस्थितीची आणि शस्त्रसंधी उल्लंघनांची माहिती दिली.
नियंत्रण रेषेवर, राजौरीमधील नौशेरा आणि सुंदरबनी, जम्मूतील अखनूर सेक्टर आणि उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला तसेच कुपवाडा जिल्ह्यांमधून नव्याने गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि सीमा सुरक्षित करण्यासाठी भारतीय सैन्याने अनेक ठिकाणी प्रत्युत्तर दिले.
संरक्षण सूत्रांनी सांगितले की, भारतीय सैन्याकडे उल्लंघन करण्यात सहभागी असलेल्या सुमारे 20 पाकिस्तानी चौक्या ओळखता येतील असे व्हिडिओ आणि छायाचित्र पुरावे आहेत. आतापर्यंत पाकिस्तानने केवळ लहान शस्त्रांचा वापर केला आहे; तोफा किंवा हवाई संरक्षण प्रणाली तैनात केलेली नाही.
J&K दहशतवादविरोधी मोहिमा
दरम्यान, अनंतनाग, पुलवाम आणि शोपियानच्या अंतर्गत भागात बंडखोरीविरोधी मोहिमा सुरू आहेत, जिथे सुरक्षा दल दहशतवादी धोक्यांचे मूळ उध्वस्त करण्यासाठी उंचावरील भूभागात शोध घेत आहेत.
जम्मू आणि काश्मीर पोलीस तसेच सीआरपीएफ दहशतवादी नेटवर्कवर गुप्त माहिती गोळा करण्यासाठी संशयित ओव्हर ग्राउंड वर्कर्ससह (OGW) घरोघरी जाऊन शोध घेत आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सातत्याने चिथावणी देत सीमेपलीकडील आक्रमकता तीव्र केली आहे.
एकट्या सोमवारी रात्री कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर येथे गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या.
एप्रिलमध्ये नियंत्रण रेषेच्या उल्लंघनात तीव्र वाढ झाली असून किमान सात घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
या महिन्याची सुरुवात 1 एप्रिल रोजी कृष्णा घाटी सेक्टरमध्ये झालेल्या खाणीच्या स्फोटाने झाली, ज्याचा उद्देश घुसखोरी सुलभ करणे हा असल्याचे मानले जाते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने अकारण गोळीबार करण्यात आला.
एप्रिल 22-23 रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच पूंछमध्ये गोळीबार झाल्याची नोंद झाली.
एप्रिल 24-25 दरम्यान आणि नंतर एप्रिल 25-26 पासून कुपवाडामध्ये अशाच प्रकारचे उल्लंघन झाले. यात नियंत्रण रेषेवरील 34 संशयित ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. 26 – 27 एप्रिलच्या रात्री कुपवाडा येथे दोन अतिरिक्त उल्लंघनांची नोंद झाली.
मोदींकडून पूर्ण मुभा
वाढत्या धोक्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा घेण्यात आला.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांची वेळ, लक्ष्य आणि स्वरूप ठरवण्याचे भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, यावर त्यांनी बैठकीत भर दिला.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)