‘ऑपरेशन सिंदूर’ मधील ICG च्या भूमिकेची संरक्षणमंत्र्यांकडून प्रशंसा

0
ICG
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 1 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत भारतीय तटरक्षक दलाच्या 50 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानच्या भूमिकेबद्दल ICG ची (भारतीय तटरक्षक दलाची) प्रशंसा करत भारताच्या सागरी सुरक्षा प्रणालीतील एक अग्रगण्य दल असे संबोधित केले.

1 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत आयोजित आयसीजीच्या 50 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात बोलताना सिंह म्हणाले की, या ऑपरेशनने वाढत्या सागरी संवेदनशीलतेच्या काळात सशस्त्र दलांमधील निर्दोष समन्वय दाखवून दिला.

“ऑपरेशन सिंदूरने भारताच्या बहुस्तरीय सागरी सुरक्षा प्रणालीमध्ये सेवांमधील निर्दोष समन्वयाचे प्रदर्शन केले आणि भारतीय तटरक्षक दलाची (आयसीजी) एक अग्रगण्य दल म्हणून असणारी भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली,” असे संरक्षण मंत्री म्हणाले.

ते म्हणाले की, तटरक्षक दलाने तत्परतेने आणि खंबीरपणे प्रतिसाद दिला. सामरिक संसाधने आधीच तैनात करण्यात आली होती. पश्चिम किनारपट्टीवर पाळत वाढवण्यात आली होती. किनारी आणि खाडीच्या भागात उच्च सतर्कता राखण्यात आली होती.

सिंह यांनी भारतीय तटरक्षक दलाचे वर्णन भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणारी ‘विश्वासू भिंत’ असे केले. ते म्हणाले की, हे दल राष्ट्रसेवेच्या खऱ्या भावनेचे प्रतीक आहे.

संरक्षणमंत्र्यांनी तटरक्षक दलाला ‘विकसित भारत 2047’ साठी सरकारच्या दृष्टिकोनानुसार, पुढील 25 वर्षांसाठी एक स्पष्ट आणि केंद्रित आराखडा तयार करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, या आराखड्यात मनुष्यबळ नियोजन आणि क्षमता विकासाचा समावेश असावा. तसेच, 2047 पर्यंत एक संघटना म्हणून भारतीय तटरक्षक दलाची भूमिका आणि ओळख निश्चित केली पाहिजे.

“जर ही आत्मपरीक्षण आणि सुधारणांची प्रक्रिया आज सुरू झाली, तर आपल्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात, भारतीय तटरक्षक दल सागरी सुरक्षेचा केवळ एक मजबूत संरक्षकच नाही, तर विकसित भारताच्या सागरी सामर्थ्याचे एक तेजस्वी प्रतीक बनेल,” असे ते म्हणाले.

सिंह यांनी दलाला अधिक चपळ आणि भविष्यासाठी सज्ज बनवण्यासाठी संघटनात्मक आणि संरचनात्मक सुधारणा करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले की, जलद गतीने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारतीय तटरक्षक दल भारताच्या सागरी सामर्थ्याचे एक मजबूत प्रतीक म्हणून उदयास येईल.

भारतीय तटरक्षक दलाला राष्ट्रीय सुरक्षेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ संबोधून सिंह म्हणाले की, हे दल एका आधुनिक आणि शक्तिशाली संघटनेत रूपांतरित झाले आहे. ते आता प्रगत जहाजे, हेलिकॉप्टर, विमाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

तटरक्षक दलाच्या कार्यामुळे भारताला आपले सागरी हितसंबंध जपण्याचा आणि नील अर्थव्यवस्था (blue economy), किनारी विकास व सागरी सुरक्षेसाठी योजना आखण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे, असेही ते पुढे म्हणाले.

सिंह यांनी सांगितले की, दहशतवाद, शस्त्र तस्करी आणि मानवी तस्करी रोखण्यात भारतीय तटरक्षक दल (ICG) महत्त्वाची भूमिका बजावते. वाढती जागतिक अस्थिरता आणि सागरी धोक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, असेही ते म्हणाले.

त्यांनी अमली पदार्थ तस्करी, चाचेगिरी, अवैध व्यापार आणि सागरी प्रदूषण यांना तोंड देण्यासाठी तटरक्षक दलाच्या योगदानावर प्रकाश टाकला.

1977 मध्ये केवळ सात जहाजांसह सुरुवात झाल्यापासून, भारतीय तटरक्षक दलाचा लक्षणीय विस्तार झाला आहे. सध्या दलाकडे 155 जहाजे आणि 80 विमाने असा ताफा आहे.

2030 पर्यंत, हे दल 200 पृष्ठभागीय जहाजे आणि 100 विमानांचा समावेश करण्याचे लक्ष्य ठेवत आहे, ज्यामुळे ते जगातील अग्रगण्य तटरक्षक दलांमध्ये स्थान मिळवेल.

1 फेब्रुवारी 1977 रोजी स्थापन झालेले भारतीय तटरक्षक दल, भारताच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि समुद्रातून उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आले होते.

आज हे दल सागरी कायद्याची अंमलबजावणी, किनारपट्टीची सुरक्षा, शोध आणि बचाव कार्य, सागरी पर्यावरण संरक्षण आणि मानवतावादी सहाय्य अशा गोष्टींसाठी  जबाबदार आहे.

तटरक्षक दल 2.01 दशलक्ष चौरस किलोमीटरच्या विशेष आर्थिक क्षेत्रावर आणि 11 हजार 098 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या किनारपट्टीवर पाळत ठेवते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, समुद्रातील त्याची सतत असणारी उपस्थिती सागरी समुदायाला दिलासा देणारी आणि उल्लंघनांना प्रतिबंध करणारी आहे, ज्यातून त्याच्या कर्मचाऱ्यांची व्यावसायिकता आणि समर्पण दिसून येते.

रवी शंकर

+ posts
Previous articleसंरक्षण क्षेत्रातील मोठ्या खरेदीमुळे भांडवली खर्चात झाली वाढ
Next articleभ्रष्टाचारविरोधी मोहीम: चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्र्यांची चौकशी सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here