कोलकात्यात मंगळवारी रात्री दाट लोकवस्तीच्या भागात असलेल्या सहा मजली हॉटेलला लागलेल्या आगीत दोन मुलांसह किमान 14 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रात्री 8.15 च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळाली आणि रितुराज हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघराजवळील खोलीत ती पहिल्यांदा आढळून आली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आगीच्या ज्वाळा आणि धुराने लवकरच बुर्राबाजारच्या मध्यवर्ती व्यावसायिक भागातील संपूर्ण इमारतीला वेढले. सूत्रांनी सांगितले की हॉटेलमधील जवळजवळ सर्व 45 खोल्यांचे आरक्षण झालेले होते आणि आग लागली त्यावेळी सुमारे 50 लोक इमारतीत होते.
श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू
पश्चिम बंगालचे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा मंत्री सुजीत बोस म्हणाले की, बहुतेक मृतदेह हॉटेलच्या पायऱ्यांवर सापडले आणि मृत्यूचे मुख्य कारण श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय आहे.
आतापर्यंत आठ मृतदेहांची ओळख पटली आहे, असे बोस यांनी सांगितले.
“फॉरेन्सिक टीम आज (बुधवारी) घटनास्थळी भेट देत असून आगीचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेलच्या आत असणारी अग्निशमन यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही हे देखील तपासले जाईल,” असे बोस म्हणाले.
हॉटेलमधील अनेक पाहुणे वेळेवर तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र एका व्यक्तीने भीतीपोटी छतावरून खाली उडी मारली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी पत्रकारांना सांगितले.
डझनभरांची सुटका
कोलकाताचे पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, पाच जणांना त्यांच्या खोल्यांमधून, तर सुमारे 20 जणांना छतावरून तर काहींना बाल्कनीतून वाचवण्यात आले.
काही लोक त्यांच्या खिडक्यांबाहेरील अरुंद कड्यांवर उभे राहिले होते. अग्निशामक दल हायड्रॉलिक शिड्यांद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांची सुटका केली असे एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय वृत्तसंस्था एएनआयच्या व्हिडिओमध्ये अग्निशामक दलाचे जवान काठावर आणि छतावर जमलेल्या लोकांना संबोधित करण्यासाठी मेगाफोनचा वापर करताना दिसत आहेत आणि त्यांना शांत राहण्याची तसेच बचावकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा करण्याची विनंती करताना दिसले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)