जम्मू-काश्मीरमधील Pahalgam येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव अधिक वाढू नये म्हणून, भारत आणि पाकिस्तानला ‘संयम बाळगण्याचे’ आवाहन करण्यासाठी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो लवकरच दोन्ही देशांच्या समकक्षांशी संवाद साधणार असल्याचे, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सांगितले.
रविवारी वॉशिंग्टनने सांगितले की, “भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी शेजारी देशांशी अनेक पातळ्यांवर संपर्क सुरू असून, त्यांना आम्ही ‘सामंजस्याची भूमिका’ घेण्याचा सल्ला दिला आहे.”
त्यानंतर, “आम्ही दोन्ही देशांशी संपर्क साधत आहोत आणि अर्थातच त्यांना परिस्थिती चिघळू न देण्याचे आवाहन करत आहोत,” असे रुबियो यांनी म्हटल्याचे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितले.
परराष्ट्र विभागाने पुढे सांगितले की, “रुबियो बुधवारी, भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधण्याची अपेक्षा करत असून, इतर देशांच्याही परराष्ट्र मंत्र्यांनीही अशाप्रकारची भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.”
अमेरिका भारताच्या बाजूने
वॉशिंग्टनने पाहलगाम हल्ल्यानंतर जाहीरपणे भारताला पाठिंबा दर्शवला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, अमेरिकेने पाकिस्तानावर कोणतीही टीका केलेली नाही.
22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात, 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यातील बहुतांश पर्यटक हे हिंदू होते. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले, तर पाकिस्तानने जबाबदारी नाकारत तटस्थ चौकशीची मागणी केली.
भारत हे चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी वॉशिंग्टनसाठी एक महत्त्वाचा भागीदार बनत आहे, तर अफगाणिस्तानमधून 2021 मध्ये अमेरिकेच्या माघारीनंतर पाकिस्तानचे महत्त्व कमी झाले असले तरी तो अमेरिकेचा सहयोगी राहिला आहे.
तणाव वाढतो आहे
काश्मीर हा बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेला भाग आहे, जो हिंदूबहुल भारत आणि इस्लामी पाकिस्तान या दोघांनी पूर्णपणे आपला असल्याचा दावा वेळोवेळी केला आहे. मात्र दोघांकडेही याचा मर्यादित भाग आहे आणि त्यांनी या हिमालयीन भागासाठी अनेक युद्धे लढलेली आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने, 1960 चा ‘सिंधू नदी पाणीवाटप करार’ (Indus Waters Treaty) रद्द केला, तर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले.
दोन्ही देशांनी आपल्या नियंत्रण रेषेवर (LoC) गोळीबाराची देवाण-घेवाणही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हल्लेखोरांना शोधून काढून त्यांना कडक शासन करण्याची शपथ घेतली आहे. तर, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी, भारताकडून लष्करी कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)