नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने नियुक्त केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एक चिथावणीखोर सूचना करत वाद निर्माण केला आहे. पहलगामच्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात नवी दिल्लीने पाकिस्तानवर लष्करी हल्ला केल्यास बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांवर कब्जा करण्याचा विचार केला पाहिजे अशी मुक्ताफळे या अधिकाऱ्याने उधळली आहेत.
सध्या 2009 च्या बांगलादेश रायफल्स (BDR) हत्याकांडातील राष्ट्रीय स्वतंत्र चौकशी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले निवृत्त मेजर जनरल ए. एल. एम. फजलुर रहमान यांनी फेसबुकवर हे विधान केले.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर ढाका आणि नवी दिल्ली यांच्यातील बिघडलेल्या संबंधांच्या दरम्यान त्यांचे हे विधान आले आहे.
‘बांगलादेशने आक्रमण केले पाहिजे’
“जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांवर आक्रमण करून तिथे कब्जा केला पाहिजे. आपण चीनबरोबर संयुक्त लष्करी कारवाईबाबत चर्चा सुरू केली पाहिजे,” असे रहमान यांनी मंगळवारी बंगाली भाषेत पोस्ट केले.
इस्लामी छात्र शिबिर या इस्लामी विद्यार्थी गटाचे माजी सदस्य, आयोगाचे सहकारी सदस्य शाहनवाझ खान चंदन यांच्याकडून या पोस्टला ‘लाइक’ मिळाले आहे.
द प्रिंटच्या वृत्तानुसार, आता जगन्नाथ विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक असलेले चंदन हे युनूस यांचे विश्वासू आहेत.
महत्त्व
पहलगाम हल्ल्यानंतर प्रादेशिक तणाव वाढलेला असतानाच रहमान यांची पोस्ट आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 1960 चा सिंधू जल करार स्थगित केला आहे, अटारी सीमा चौकी बंद केली आहे तसेच पाकिस्तानबरोबरचे राजनैतिक संबंध कमी केले आहेत.
दरम्यान, ढाकाने इस्लामाबादशी पुन्हा संबंध जोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
यापूर्वी एप्रिलमध्ये, दोन्ही देशांनी सुमारे 15 वर्षांत त्यांची पहिली परराष्ट्र सचिव-स्तरीय चर्चा आयोजित केली होती, ज्यात द्विपक्षीय संबंध आणि प्रलंबित ऐतिहासिक मुद्द्यांवर चर्चा झाली होती.
इतर निर्णयांमध्ये शिथिल व्हिसा धोरणे आणि 1971 च्या घटनांबद्दल नव्याने चर्चा करणे समाविष्ट आहे.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांच्या दौऱ्याची योजना आखली जात आहे, परंतु बदलत्या प्रादेशिक गतिशीलतेमुळे अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
ए. एल. एम. फजलुर रहमान कोण आहे?
माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी असलेल्या रहमान यांनी 2001 मध्ये भारताशी झालेल्या सीमा संघर्षादरम्यान बांगलादेश रायफल्सचे नेतृत्व केले होते. या संघर्षात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) 16 जवान शहीद झाले होते.
रहमान यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या अपील विभागातील न्यायाधीशाच्या समतुल्य दर्जाचे पद देण्यात आले असून 2009 च्या BDR बंडाच्या चौकशी आयोगाचे नेतृत्व ते करत आहेत. या बंडात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह 74 लोक मारले गेले होते.
रहमान यांनी बऱ्याच काळापासून असा आरोप केला आहे की या बंडाच्या मूळ तपासात महत्वाची माहिती दडपली गेली आहे ज्यात संभाव्य परदेशी-विशेषतः भारतीय-सहभागाचे संकेत मिळण्याची शक्यता होती. “या हत्याकांडात बाह्य शक्तींनी भूमिका बजावली आहे की नाही हे ठरवणे हे आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
तणावात आणखी भर पडणार
त्यांच्या अलीकडील विधानांमुळे भारत-बांगलादेश संबंधांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः चिनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत युनूस यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर. या बैठकीत त्यांनी असा दावा केला होता की भारत नाही तर बांगलादेश हे दक्षिण आशियासाठीचे खरे प्रवेशद्वार आहे.
“‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखला जाणारा भारताचा पूर्व भाग भूपरिवेष्टित आहे आणि त्याला सागरी प्रवेश नाही. बांगलादेश हा या क्षेत्रातील एकमेव सागरी दुवा आहे, जो प्रचंड क्षमता प्रदान करतो,” असे युनूस या बैठकीच्या एका व्हिडिओमध्ये म्हणाले, जो त्यानंतर व्हायरल झाला आहे.
ते पुढे म्हणाले की, चीनच्या वतीने बांधकाम, उत्पादन आणि जागतिक व्यापारात गुंतलेल्या चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणून बांगलादेश काम करू शकतो.
टीम स्ट्रॅटन्यूज