पाकिस्तानकडून संघर्षविरामचे उल्लंघन,भारताच्या सीमावर्ती भागात गोळीबार

0
उल्लंघन
9 मे 2025 रोजी पाकिस्तानातील कराची बंदराच्या मीडिया टूर दरम्यान एक निमलष्करी दलातील सैनिक वाहनावर बंदूक ठेवून पहारा देत असताना. (रॉयटर्स/शकील आदिल)

भारत आणि पाकिस्तानने संघर्षविरामावर एकमत झाल्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच, शनिवारी नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील (IB) अनेक ठिकाणी पाकिस्तानने कराराचे उल्लंघन केल्याचे वृत्त आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील उल्लंघनांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याचे निर्देश सीमा सुरक्षा दलाला (BSF) देण्यात आले आहेत.

इस्लामाबादने संघर्षविरामाची चर्चा सुरू केल्यानंतर भारताने तसा करार झाल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच पाकिस्तानने ही आगळीक केली. त्यानंतर लगेचच पाकिस्तान सरकारनेही या कराराला दुजोराही दिला.

राजनैतिक यशानंतरही, श्रीनगरमध्ये अनेक स्फोट झाल्याची नोंद झाली, ज्यामुळे परिसरात सुरक्षा यंत्रणांनी ब्लॅकआउट केले. वेगवेगळ्या घटनांमध्ये, राजस्थानमधील पोखरण आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे ड्रोन पाडण्यात आले, ज्यामुळे संवेदनशील क्षेत्रांमधला तणाव वाढल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा सेक्टरला लक्ष्य करून तोफांचा मारा केला. त्याच वेळी, जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरही (एलओसी) संघर्षविरामाचे उल्लंघन केल्याची नोंद झाली.

बारामुल्लामध्ये, सुरक्षा दलांनी एक ड्रोन पाडला. याशिवाय संशयास्पद मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) अनेक ठिकाणी दिसल्याची नोंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून बारामुल्ला आणि श्रीनगर अशा दोन्ही ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आले आहे. राजौरीमध्येही अतिरिक्त ड्रोन हालचाली दिसून आल्या, तर सांबा जिल्ह्यात हवाई हल्ला झाल्याचा सायरन वाजवण्यात आला, ज्यामुळे जम्मू प्रदेशातील सुरक्षाविषयक काळजी आणखी वाढली आहे.

‘काय झालं?’

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले, “काय झालं युद्धबंदीचं? श्रीनगरमध्ये स्फोट ऐकू येत आहेत!!!.”


दुसऱ्या एका ट्विटमध्ये अब्दुल्ला म्हणाले, “हा संघर्षविराम नाही. श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या हवाई संरक्षण तुकड्या आता कार्यरत झाल्या आहेत.”

त्यांनी ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला.

ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ट्रुथ सोशलवर पोस्ट करून दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये संघर्षविराम झाल्याची घोषणा केली.

ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्री झालेल्या दीर्घ चर्चेनंतर’ दिल्ली आणि इस्लामाबाद दोघांनीही करार केला.

त्यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले: “अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्री झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ संघर्षविरामावर सहमत झाले आहेत. कॉमन सेन्स आणि उत्तम बुद्धिमत्ता वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!”

भारताचा दुजोरा

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एका छोट्या निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज 15.30 वाजता (दुपारी 3.30)  भारताच्या डीजीएमओंना फोन केला. दोन्ही बाजूंनी 17.00 वाजल्यापासून (संध्याकाळी 5 वाजता)  जमिनीवरील, हवेतील आणि समुद्रातील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती झाली.”

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पोस्ट केले की, “भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करता भूमिका घेतली आहे. ते असेच करत राहील.”

टीम स्ट्रॅटन्यूज


Spread the love
Previous articleAfter Decisive Strikes by India, Pakistan Backs Down—Ceasefire Declared
Next articleOperation Sindoor in Motion: India’s Defining Moment in Modern Military Strategy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here