भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये (PoJK) एकूण नऊ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करत त्यांना उद्ध्वस्त केले. ‘Operation Sindoor’ अंतर्गत करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईक्सद्वारे, भारताने आपले प्रमुख राजकीय व लष्करी उद्दिष्ट साध्य केले असल्याचे दिसून येते. भारताच्या प्रमुख टार्गेट्समध्ये मुरीदके (लष्कर-ए-तोयबाचा गड, जो पहलगाम हल्ल्याशी संबंधित आहे) आणि बहावलपूर (जैश-ए-मोहम्मदचा केंद्रबिंदू, २६/११ मुंबई हल्ल्यास जबाबदार आहे) यांचा समावेश होता. या ऑपरेशनमध्ये भारताने काही विमाने गमावल्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.
ऑपरेशनचा संदेश स्पष्ट आहे की: भारताची राजकीय इच्छाशक्ती आणि लष्करी क्षमता पाकिस्तानच्या अंतर्भागाला टार्गेट करायला पुरेशी आहे. हे हल्ले पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही झाले, जो पाकिस्तान लष्कराच्या भरतीचा मुख्य भाग आणि राजकीय प्रभावाचा गड मानला जातो.
पाकिस्तान उत्तर देणार का?
२०१९ मधील बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने मर्यादित प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी एका भारतीय विमानाचा अपघात झाला होता आणि वैमानिकाला पाकिस्तानने पकडले होते. त्यानंतर तो १ मार्च रोजी भारतात परत आणण्यात आला.
यावेळी इस्लामाबादकडून यावर काही प्रतिक्रिया येईल का, हे अनिश्चित आहे. मात्र, भारताचे सध्याचे मूल्यांकन स्पष्ट आहे, की पाकिस्तानने जर परत प्रतिहल्ला केला, तर त्यातून उद्भवणाऱ्या कुठल्याही वाढीला इस्लामाबाद जबाबदार असेल.
भारताची जागतिक राजकीय मोहीम
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका, सौदी अरेबिया, फ्रान्स आणि रशिया यांसारख्या देशांना याविषयी माहिती दिली आहे. आणखी काही देशांसह चर्चा होणार आहे.
परराष्ट्र सचिव विक्रांत मिस्री यांनी या बैठकीत भारताच्या कारवाईमागची भूमिका स्पष्ट केली.
“पहलगाम हल्ल्याला दोन आठवडे झाले असतानाही, पाकिस्तानने आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या दहशतवादी यंत्रणेवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही,” असे मिस्री म्हणाले.
भारताकडून नियंत्रित कारवाया
भारताने स्पष्टपणे सांगितले की, “ही लष्करी कारवाई मर्यादित स्वरुपाची आणि फक्त दहशतवादी तळांवर केंद्रित होती. यामागील उद्देश होता पहलगाम हल्ल्याचा बदला घेणे आणि भविष्यातील हल्ले टाळणे, युद्ध भडकवणे नव्हे.”
“आज सकाळी भारताने आपले अधिकार बजावत कारवाई केली. ही कारवाई मोजकी, प्रमाणबद्ध, वाढ न करणारी आणि जबाबदार होती,” असे मिस्री यांनी, २५ एप्रिल रोजी झालेल्या UN सुरक्षा परिषदेच्या निवेदनाचा संदर्भ देत सांगितले.
लष्कर प्रवक्त्यांची प्रतिक्रिया
दिल्लीतील राष्ट्रीय पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, “पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला करण्यात आलेला नाही तसेच सामान्य नागरिकांचा बळी जाऊ नये, याकरता विशेष खबरदारी घेण्यात आली होती. सर्व टार्गेट्स विश्वसनीय गुप्तचर माहितीनुसार निवडली गेली होती.”
ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेली ठिकाणे:
1. सवाई नाला, मुजफ्फराबाद (PoJK)
लष्कर-ए-तोयबाचा प्रशिक्षण तळ; सोनमर्ग-गुलमर्ग (ऑक्टोबर २०२४) आणि पहलगाम (एप्रिल २०२५) हल्ल्याचे नियोजक येथे कार्यरत.
2. सैयदना बिलाल कॅम्प (PoJK)
जैश-ए-मोहम्मदचे शस्त्रास्त्र आणि जंगल युद्ध प्रशिक्षण केंद्र.
3. कोटली गुलपूर (PoJK)
एप्रिल २०२३ पूंछ हल्ला आणि जून २०२४च्या यात्रेकरू बस हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे मुख्यालय.
4. भींबर (PoJK)
स्फोटके व जंगल प्रशिक्षण केंद्र, नियंत्रण रेषेपासून ९ किमी अंतरावर.
5. कोटली अब्बास (PoJK)
लष्कर-ए-तोयबाचा शिबिर, घुसखोरीसाठी वापरले जाते.
6. सर्जाल कॅम्प, सियालकोट (पंजाब, पाकिस्तान)
आंतरराष्ट्रीय सीमेपासून ६ किमी अंतरावर; मार्च २०२५ मध्ये चार जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हत्येस जबाबदार.
7. महमूना जोया, सियालकोट (पंजाब)
हिज्बुल मुजाहिदीनचे नियंत्रण केंद्र; पठाणकोट हवाई दल तळावरच्या हल्ल्याशी संबंधित.
8. मरकज तैयबा, मुरीदके (पंजाब)
लष्करचा मुख्य प्रशिक्षण तळ; २६/११ मुंबई हल्ल्यातील अजमल कसाब व डेव्हिड हेडली येथे प्रशिक्षित.
9. मर्ताज सुभानअल्लाह, बहावलपूर (पंजाब)
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय; आत्मघातकी हल्लेखोरांचे भरती केंद्र.
संदेश स्पष्ट आहे
“भारतीय नागरिकांवर हल्ला झाला तर परिणाम भोगावे लागतील, आमचा प्रतिसाद जलद, योग्य आणि लक्ष्यित असेल,” असे कर्नल कुरेशी यांनी स्पष्ट केले.
भारत सध्या राजकीय संवाद आणि पुरावे सादर करण्याचे कार्य सुरू ठेवणार आहे. आता पाकिस्तान यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
– रवि शंकर