कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन निर्भीड महिला अधिकाऱ्यांनी आज एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत भारताचा पाकिस्तानला दिलेल्या धाडसी प्रतिसादाबद्दल माहिती देण्यासाठी मध्यवर्ती भूमिका पार पाडली. भारताने ऑपरेशन सिंदूर अंमलात आणत असताना – अलीकडच्या काळातील सर्वात निर्णायक दहशतवादविरोधी हल्ल्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या – बदलाचे एक शक्तिशाली प्रतीक समोर आलेः कर्नल सोफिया कुरेशी, भारताच्या सशस्त्र दलातील महिलांच्या भूमिकेची पुनर्रचना करणारी अग्रणी महिला. त्यांच्या उपस्थितीमुळे केवळ भारताची लष्करी अचूकताच नव्हे तर देशाच्या सशस्त्र दलांमध्ये महिला बजावत असलेल्या परिवर्तनात्मक भूमिकेचेही दर्शन घडले.
कर्नल सोफिया कुरेशी: आदर्श नेतृत्व
भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समधील करिअर अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी अनेक अडथळे पार केले आहेत. फोर्स 18 बहुराष्ट्रीय सरावात लष्करी प्रशिक्षण तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे. यामध्ये आसियान आणि सहयोगी देशांचा समावेश आहे. सर्व सहभागी राष्ट्रांच्या प्रतिनिधींमध्ये त्या एकमेव महिला कमांडर होत्या. भारतीय लष्करात लिंग समावेशाच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.
2006 मध्ये काँगोमध्ये त्या तैनात होत्या. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये व्यापक अनुभव असलेल्या कर्नल कुरेशी यांनी जागतिक स्तरावर मानवतावादी कारवाई आणि शांतता प्रशिक्षणात योगदान दिले आहे. दक्षिणेकडील लष्कराचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि सैन्यात समान जबाबदारी तसेच संधीचे प्रतीक म्हणून त्यांची भूमिका अधोरेखित केली.
हल्ल्यांनंतर माध्यमांना संबोधित करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे तत्वज्ञान सारांश रूपाने सांगितले:
“उद्दिष्ट स्पष्ट आहे: भारतीय नागरिकांवरील हल्ल्यांचे परिणाम भोगावे लागतील. आमचा प्रतिसाद जलद, न्याय्य आणि अचूक होता.”
विंग कमांडर व्योमिका सिंग: लहानपणापासूनच लढाऊ पायलट बनण्याचे स्वप्न
विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा प्रवास विमान उड्डाणाच्या स्वप्नापासून सुरू झाला. शालेय शिक्षणानंतर, जेव्हा त्या राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील झाल्या आणि नंतर अभियांत्रिकी पदवी घेतली तेव्हा त्यांच्या स्वप्नाला आकार आला. सशस्त्र दलात सामील होणारी त्या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सदस्य बनल्या.
भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त झाल्यानंतर, त्यांना 18 डिसेंबर 2019 रोजी उड्डाण शाखेत कायमस्वरूपी कमिशन देण्यात आले. तेव्हापासून, त्यांनी 2 हजार 500 तासांपेक्षा जास्त उड्डाण केले आहे, जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येसह भारतातील काही सर्वात आव्हानात्मक प्रदेशांमध्ये चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर सारख्या विमानांचे पायलटिंग त्यांनी केले आहे.
त्यांची कामगिरी पार पाडण्याची क्षमता जबरदस्त आहे. त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात विशेषतः कठीण हवामान असलेल्या दुर्गम, उंचावरील प्रदेशांमध्ये अनेक उच्च-जोखीम बचाव मोहिमांचे नेतृत्व केले आहे – अशा मोहिमा जिथे हवाई मदत जीवन आणि मृत्यूमध्ये फरक घडवून आणू शकते.
2021 मध्ये, त्यांनी माउंट मणिरंग (21 हजार 650 फूट) येथे झालेल्या त्रिसेवेतील सर्व महिलांच्या गिर्यारोहण मोहिमेत भाग घेतला. हवाई दल प्रमुखांनी मान्यता दिलेल्या या कष्टकरी मोहिमेने त्यांच्या सहनशक्ती आणि नेतृत्वाचे दर्शन तर घडलेच शिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक संरक्षण भूमिकांमध्ये महिलांची वाढती उपस्थिती हा मुद्दा देखील अधोरेखित झाला.
ऑपरेशन सिंदूर ब्रीफिंगमध्ये, विंग कमांडर सिंग यांनी हल्ल्यांच्या अचूकतेवर भर दिला:
“विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे लक्ष्यांची ठिकाणे काळजीपूर्वक निवडली गेली. नागरी क्षेत्रे जाणूनबुजून टाळण्यात आली. ही एक जबाबदार आणि कॅलिब्रेटेड कामगिरी होती.”
भारताच्या लष्करी इतिहासातील एक नवा अध्याय
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने न्याय मिळवून दिला, तेव्हा कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंग सारख्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने एक सखोल बदल अधोरेखित केला – जिथे महिला आता लढाईच्या कथांमधील सीमारेषांवर नाहीत तर प्रत्येक स्तरावर त्यांना आकार देत आहेत.
त्यांची सेवा केवळ प्रेरणादायी नाही; तर कामगिरीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्या कमांडर, बचावकर्ते, गिर्यारोहक आणि प्रवक्त्या आहेत – ज्या भारताच्या नवीन पिढीतील महिला योद्ध्यांना मूर्त रूप देतात ज्या राष्ट्राची सेवा करण्याच्या अर्थाला पुन्हा एकदा नवा आयाम देणाऱ्या ठरल्या आहेत.
हुमा कुरेशी