मोठा निर्णय; भारताने सर्व प्रकारच्या Pakistani Imports वर घातली बंदी

0

अलीकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातींवर भारताने पूर्णत: बंदी लागू केली असून, यामागे राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाशी संबंधित कारणे दिली आहेत.

वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तात्काळ प्रभावाने, पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षरित्या आयात होणाऱ्या किंवा ट्रान्झिटमध्ये असलेल्या कोणत्याही वस्तू भारतात येऊ दिल्या जाणार नाहीत. यामध्ये काही अपवादात्मक वस्तू असल्यास त्याकरता केंद्र सरकारची पूर्वमान्यता आवश्यक असेल.

वाढता तणाव

हे पाऊल, 26 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उचलले गेले आहे. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले.

गुप्तचर अहवालानुसार, हा हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नवी दिल्लीने त्वरीत आणि कठोर प्रतिक्रिया दिली आहे.

वाघा-अटारी व्यापार मार्ग आधीच बंद करण्यात आला होता, त्यातच आता लागू करण्यात आलेली ही पूर्ण आयातबंदी पूर्वीच्या उपाययोजनांपेक्षा अधिक तीव्र आहे. जसे की, 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील वस्तूंवर २००% आयात शुल्क लावण्यात आले होते. 2024-25 मध्ये पाकिस्तानमधून होणारी आयात भारताच्या एकूण आयातींपैकी 0.0001% पेक्षाही कमी होती.

हल्ल्याचे परिणाम

भारताने याआधीच सिंधू जल करारही निलंबित केला आहे आणि पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्याची किंवा वळवण्याची शक्यता वर्तवली आहे, या निर्णयाचा दोन कोटींपेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिकांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

तसेच, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाही रद्द करण्यात आले असून, वैद्यकीय व्हिसासह अन्य सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर तिकडे, पाकिस्तानने सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे, ज्यामध्ये ऐतिहासिक शिमला कराराचाही समावेश आहे. नियंत्रण रेषेवर संघर्ष आणि कुरघोडी सुरु असतानाच, दोन्ही देशांतील राजकीय संबंध अधिकच ढासळले आहेत.

भारताने नेहमीच पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला समर्थन देत असल्याचा आरोप केला आहे, जो पाकिस्तान नाकारत आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद पूर्णतः नष्ट होईपर्यंत कोणतीही व्यापार चर्चा होणार नाही.”

पहलगाम दहशतवादी हल्ला

26 एप्रिल रोजी, पहलगामच्या निसर्गरम्य बैसरण कुरणावर अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला. दहशतवाद्यांनी बहुतेक हिंदू पर्यटकांसह 26 नागरिकांची निर्घृण हत्या केली. ही देशातील नागरिकांवर झालेल्या सर्वात भीषण दहशतवादी घटनांपैकी एक मानली जात आहे.

जिवंत बचावलेल्यांनी सांगितले की, “हल्लेखोरांनी काही जणांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले व इस्लामी आयते म्हणण्यास सांगितले. जे अपयशी ठरले किंवा गोंधळले, त्यांना डोक्यात गोळी घालून ठार मारले गेले.”

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाच दहशतवाद्यांच्या गटाने बैसाना कुरणातील तीन भागांमध्ये विभागून अचानक हल्ला चढवला.

10 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत झालेल्या या हल्ल्यात, 25 पर्यटक आणि एक स्थानिक पोनी ऑपरेटर ठार झाला.

हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये एक गुप्तचर विभागाचा अधिकारी, एक नौदलाचा लेफ्टनंट आणि हवाई दलातील एक कॉर्पोरल यांचा समावेश होता, ते तिघेही कुटुंबासह पहलगाम येथे सुट्टीसाठी आले होते.

या हत्याकांडामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, नवी दिल्लीने या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्याची शपथ घेतली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज


+ posts
Previous articleIsraeli Strike: सीरियाच्या राष्ट्रपती भवनाजवळ इस्रायलचा हल्ला
Next articleFour Days to Defeat? Ammunition Shortfall Raises Alarms Over Pakistan’s War Readiness

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here