पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने बुधवारी पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र (Airspace) बंद केले. याआधी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतीय विमानांना आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घातली होती. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.
भारतीय सरकारने एका सूचनेत सांगितले की, “हवाई क्षेत्राच्या वापरावर घातलेली ही बंदी, 30 एप्रिलपासून 23 मे पर्यंत लागू राहील.”
शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले
बुधवारी संध्याकाळी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, यांच्याशी फोनवर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, “भारताचे जबरदस्ती पाकिस्तानला या घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही भरताचे सर्व आरोप फेटाळून लावतो,” असे म्हटल्याचे, शरीफ यांच्या कार्यालयाने एका निवेदनात सांगितले.
शरीफ यांनी पारदर्शक, विश्वासार्ह आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आणि अमेरिकेने भारताला “आक्रमक भाषा थांबवण्यास आणि जबाबदारीने वागण्यास” प्रवृत्त करावे, असे आवाहन केले.
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हवाई क्षेत्र बंदीचा परिणाम
या बंदीमुळे, पाकिस्तानच्या विमान वाहतूक उद्योगावर भारताच्या तुलनेने कमी परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण फक्त पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करून कुआलालंपूरपर्यंत उड्डाण करते.
मागील आठवड्यात पाकिस्तानने भारतीय मालकीच्या किंवा भारतीय ऑपरेटर असलेल्या विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आणि सर्व व्यापार (तिसऱ्या देशांमार्फत होणारा व्यापारदेखील) स्थगित केला, तसेच भारतीय नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विशेष दक्षिण आशियाई व्हिसांनाही स्थगिती दिली.
PIA या पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनीने मंगळवारी सांगितले की, वाढत्या द्विपक्षीय तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय हवाई क्षेत्र टाळण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताकडून लवकरच लष्करी कारवाई?
बुधवारी पाकिस्तानने सांगितले की, ‘भारत लवकरच लष्करी कारवाई करणार असल्याची गुप्तचर माहिती त्यांना मिळाली असून, दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये यामुळे तणाव वाढत आहे.’
भारताने तीन हल्लेखोरांची ओळख पटवली असून, त्यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. भारताने त्यांना “दहशतवादी” असे घोषित केले आहे, जे मुस्लिमबहुल काश्मीरमध्ये हिंसक उठाव करत आहेत. मात्र, पाकिस्तानने त्यांच्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानने परस्परांविरोधात अनेक उपाययोजना केल्या असून, त्यात सिंधू नदी पाणी करार निलंबित करणे हा एक महत्वाचा निर्णय समाविष्ट आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)