भारताने टोरांटोमध्ये रविवारी पार पडलेल्या वादग्रस्त मिरवणुकीविरोधात, कॅनडाकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या परेडमध्ये, भारताच्या नेतृत्वाविरोधात “अस्वीकार्य दृश्ये” प्रदर्शित केली गेली आणि “धमकीवजा भाषा” वापरण्यात आली, असे वृत्तसंस्थांनी सांगितले आहे.
या मिरवणुकीत खलिस्तानचे प्रचार करणाऱ्या झाकी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य भारतीय नेत्यांविरोधात द्वेष पसरवणाऱ्या चित्रफितींचा समावेश होता, ज्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
PTI (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) ने दिलेल्या माहितीनुसार, भारताने नवी दिल्लीतील कॅनेडियन उच्चायुक्त कार्यालयाकडे अत्यंत तीव्र शब्दांत आपला निषेध व्यक्त केला आहे. भारताच्या मते, कॅनडाच्या भूमीवर भारतविरोधी घटकांद्वारे वारंवार केले जाणारे असे उन्मादी प्रकार आधीपासूनच दोन्ही देशांतील तणावाला कारणीभूत ठरत आहेत.
https://x.com/Rahulk123d/status/1919406010571063641
ठोस कारवाई करा – नवी दिल्लीची स्पष्ट मागणी
एक सूत्राने PTI ला सांगितल्यानुसार, “टोरंटोमध्ये झालेल्या मिरवणुकीत, जिथे आमच्या नेतृत्वाविरोधात आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांविरोधात, अस्वीकार्य दृश्य व धमकीवजा भाषा वापरण्यात आली, त्यावर आम्ही कॅनेडियन उच्चायुक्तालयाशी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.”
नवी दिल्लीने पुन्हा एकदा कॅनडियन सरकारकडे मागणी केली आहे की, त्यांच्या देशातून कार्यरत असलेल्या फुटीरतावादी आणि अतिरेकी गटांविरोधात ठोस कारवाई केली जावी. “आम्ही पुन्हा एकदा कॅनडाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की, जे भारतविरोधी द्वेष पसरवतात आणि फुटीरतावादी अजेंडा चालवतात, अशा गटांविरोधात तात्काळ कृती करावी,” अशी मागणी नवी दिल्लीकडून करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.
तणावपूर्ण संबंधात आणखी वाढ
या वादग्रस्त परेडमुळे, भारत आणि कॅनडामध्ये आधीपासून असलेले तणावपूर्ण संबंध, आणखीनच बिघडले आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये, कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे संबंध इतिहासातील सर्वांत खालच्या स्तरावर गेले.
भारताने हे आरोप “विनोदी व हेतुपूर्वक” असल्याचे म्हणत फेटाळले. या प्रकरणात कॅनडाने भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यासह अनेक भारतीय मुत्सद्द्यांना जोडल्यावर भारतानेही प्रत्युत्तरादाखल वर्मा आणि आणखी पाच भारतीय मुत्सद्दे परत बोलावले व तितक्याच संख्येने कॅनेडियन मुत्सद्द्यांना भारतातून हाकलून दिले.
ट्रूडो यांनी सत्ता गमावल्यानंतर आणि अर्थतज्ज्ञ मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळवल्यानंतर, भारताने द्विपक्षीय संबंध सुधारण्यासंदर्भात सकारात्मकता व्यक्त केली होती.
नवी दिल्लीने असे सूचित केले की, कार्नी यांच्या नेतृत्वाखाली विश्वास, परस्पर संवेदनशीलता आणि समन्वयावर आधारित नवे पर्व सुरू होऊ शकते.
भारताने हे सातत्याने स्पष्ट केले आहे की, संबंधांतील दुरावा ट्रूडो सरकारच्या अतिरेकी व फुटीरतावादी घटकांप्रती असलेल्या उदार धोरणामुळेच निर्माण झाला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज