पाकिस्तानला दिलेल्या कर्जाचा आढावा घेण्याची भारताची IMF ला विनंती

0
IMF

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचा आणि कर्जाच्या वितरणाचा आढावा घेण्यास भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (IMF) सांगितल्याचे सरकारी सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.

पाकिस्तानने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) 7अब्ज अमेरिकन डॉलर्सचा बेलआउट कार्यक्रम मिळवला आणि मार्चमध्ये त्याला 1.3 अब्ज डॉलर्सचे नवीन climate resilience loan देण्यात आले.

गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 26 पुरुष ठार झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे. अण्वस्त्रधारी प्रतिस्पर्ध्यांमधील ताजे संकट लष्करी संघर्षात बदलू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पाठिंब्यावर भारताचे प्रश्नचिन्ह

हा कार्यक्रम पाकिस्तानच्या 350 अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. बेलआउट अंतर्गत आपली अर्थव्यवस्था स्थिर झाली असून  डिफॉल्टचा धोका टाळण्यास मदत झाली असल्याचे पाकिस्तानने वारंवार म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानला दिलेल्या कर्जांबाबत IMF कडे चिंता व्यक्त केली आणि या कर्जांचे पुनरावलोकन करावे अशी मागणी केल्याचे सरकारी सूत्रांनी तपशील न देता रॉयटर्सला सांगितले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि भारताच्या अर्थ मंत्रालयाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

‘योग्य मार्गावर आहोत’

पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचे सल्लागार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा कार्यक्रम योग्य मार्गावर आहे.

सल्लागार खुर्रम शेहझाद यांनी रॉयटर्सला सांगितले की, “अलीकडील घेण्यात आलेल्या आढाव्यात आमची प्रगती चांगला असल्याचे दिसून आले आणि आम्ही पूर्णपणे योग्य मार्गावर आहोत,”  वॉशिंग्टनमधील वित्तीय संस्थांशी पाकिस्तानच्या वसंत ऋतूतील बैठका अतिशय फलदायी ठरल्या.

आम्ही सुमारे 70 बैठका घेतल्या. अर्थव्यवस्था बदलत असताना पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना खूप जास्त स्वारस्य आहे,” असे शहजाद म्हणाले.

हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात

नवी दिल्लीने पाकिस्तानी नागरिक असलेल्या दोन हल्लेखोरांसह तीन हल्लेखोरांची ‘दहशतवादी’ म्हणून ओळख पटवली आहे. इस्लामाबादने मात्र यामागे आपला हात असल्याचे नाकारले असून  तटस्थ चौकशीची मागणी केली आहे.

भारताने एक महत्त्वपूर्ण नदी पाणी वाटप करार स्थगित केला आणि दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.

वाढता तणाव

दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावामुळे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे तणाव कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी वॉशिंग्टनला आशा असल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी गुरुवारी सांगितले.

मुस्लिम-बहुसंख्य काश्मीरवर भारत आणि पाकिस्तान दोघेही दावा करतात.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

 


+ posts
Previous articleAdvanced Light Helicopters Grounded: HAL’s Reputation At Stake
Next articleएअर मार्शल तिवारी यांनी स्वीकारला हवाई कर्मचारी उपप्रमुखपदाचा कार्यभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here