भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादमध्ये दाखल

0
भारत-पाक
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची, हे सोमवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एक दिवसीय दौऱ्यावर आले असून, त्यांनी यावेळी उच्चस्तरीय नेत्यांची भेट घेतली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांचा हा दौरा भारत-पाक मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला आहे.

पहलगाममध्ये झालेल्या जीवघेण्या दहशतवादी हल्ल्यात, भारताने पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला आहे, जो इस्लामाबादने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की, भारत लवकरच त्यांच्यावर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती त्यांच्या “विश्वसनीय गुप्तचरांनी” दिली आहे, ज्यामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धाची शक्यता वाढली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले नाही की, इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची भारत-पाकिस्तान तणावावर चर्चा करतील, पण इस्लामाबादमधील इराणचे राजदूत रेझा अमीरी मोघद्दम यांनी सरकारी प्रसारमाध्यमांना सांगितले की हा मुद्दा चर्चेच्या अजेंड्यावर असेल.

“इराणचे पाकिस्तान आणि भारताशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे, उपखंडातील तणाव कमी करण्याचे मार्ग ही अराकची यांच्या भेटीदरम्यान चर्चेची एक महत्त्वाची बाब असेल,” असे ते म्हणाले.

अराघची हे एका दिवसासाठी इस्लामाबादमध्ये असून, ते या आठवड्याच्या शेवटी दिल्लीलाही भेट देणार आहेत. त्यांचे हे दोन्ही दौरे पहलगाम घटनेपूर्वीच नियोजित होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

“दोन्ही देश प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही आपली मते मांडतील,” असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या विषयावर लगेच प्रतिसाद दिला नाही. यापूर्वी भारताने काश्मीरसंबंधी कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीचा स्पष्टपणे विरोध केला आहे.

पहलगाम हल्ला झाल्यापासून, पाकिस्तान विविध देशांच्या राजधानींशी संपर्कात असल्याचे परराष्ट्र कार्यालयाने सांगितले. अलीकडेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसहाक डार आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव यांच्यात टेलिफोनवरून चर्चा देखील झाली.

“लाव्हरोव यांनी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आणि समस्या सोडवण्यासाठी कूटनीती महत्त्वाची असल्यावर भर दिला,” असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने रविवारी दिलेल्या निवेदनात नमूद केले. त्यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आणि संघर्ष टाळावा असेही सुचवले.

इस्लामाबादने संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्या प्रतिनिधींना सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याचा आग्रह केला आहे, जेणेकरून भारताच्या ‘आक्रमक कारवायांमुळे’ उपखंडातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे, हे स्पष्टपणे सांगता येईल. तथापि, भारतातील नेते याबाबत ठाम आहेत की, पाकिस्तान राज्यपुरस्कृत दहशतवाद सहजासहजी थांबवणार नाही.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleआता परदेशी चित्रपटांवर 100 टक्के कर लावण्याची ट्रम्प यांची घोषणा
Next articleJapan Supports India Amid Terror Threats, Eyes Defence Pact

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here