एलएसीवरील सैन्य माघारी ‘जवळपास पूर्ण’-संरक्षणमंत्री

0
एलएसीवरील
आसामच्या तेजपूर येथील बॉब खटिंग संग्रहालयाच्या ई-उद्घाटन समारंभात संरक्षणमंत्री सिंह

एलएसीवरील (वास्तविक नियंत्रण रेषा)  भारतीय आणि चिनी सैन्य माघारीची प्रक्रिया “जवळपास पूर्ण” झाली आहे, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केली. सीमेवर स्थिरता कायम रहावी यासाठीच्या प्रयत्नांमध्ये “माघार घेण्याच्या पलिकडे” जाण्याची भारताची वचनबद्धता लक्षात घेता त्या प्रक्रियेला “वेळ लागेल” असा इशारा त्यांनी दिला.
वास्तविक नियंत्रण रेषेवरील काही भागातील तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीन राजनैतिक तसेच लष्करी अशा दोन्ही पातळ्यांवर चर्चा करत आहेत. परिणामी समान आणि परस्पर सुरक्षेच्या आधारावर व्यापक सहमती निर्माण झाली आहे. पारंपरिक भागात गस्त घालण्याचे आणि चराईचे अधिकार या सहमती आणि एकमतामध्ये समाविष्ट आहेत. या सहमतीच्या आधारे, माघार घेण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे,” असे ते म्हणाले.
आसामच्या तेजपूर येथील बॉब खटिंग संग्रहालयाच्या ई-उद्घाटन समारंभात बोलताना सिंह म्हणाले, “हे प्रकरण सैन्य माघारीच्या पलीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल; पण त्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल.”
संरक्षणमंत्र्यांनी आसाममधील तेजपूर येथील 4 कॉर्प्स मुख्यालयातून दूरस्थपणे (remotely) या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मूलतः बॉब खटिंग शौर्य संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी ते तवांगला भेट देणार होते, मात्र प्रतिकूल हवामानामुळे ते तवांगला जाऊ शकले नाहीत.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) डेपसांग आणि डेमचोक सेक्टरमधील समन्वित गस्त पुढील आठवड्यात सुरू होईल, असे वृत्त भारतशक्तीने दिले होते. डेपसांगमधील दोन्ही बाजूंच्या तात्पुरत्या बांधकामांचे साहित्य गोळा करणे आणि तोडफोड करून बांधकाम नष्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय गस्त पथक कोणत्याही वेळी पेट्रोल पॉईंट 10 ते 13 पर्यंत पोहोचू शकते. मात्र प्रतिकूल हवामानामुळे डेमचोकमधील प्रक्रियेला जास्त वेळ लागला आहे. हा विलंब आणखी काही दिवस असेल. एकदा ही संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर, दोन्ही देशांकडून याची संयुक्त पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर 2020 पूर्वीची एकमेकांच्या गस्त घालण्याची आणि स्थानिक मेंढपाळांसाठी चराईच्या भागात प्रवेश करण्याची प्रथा पुन्हा सुरू होईल.
पुढील टप्पा, ज्यामध्ये समन्वित गस्त सुरू करणे समाविष्ट आहे, 3 नोव्हेंबरपूर्वी सुरू होणार नाही. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार, या समन्वित गस्तीमध्ये गस्तीची तारीख, वेळ आणि आकार याबद्दल समोरच्या पक्षाला आगाऊ माहिती प्रदान करणे समाविष्ट असेल. डेपसांगजवळील पेट्रोलिंग पॉईंट 10 ते 13 पर्यंत गस्तीचा अधिकार पुनर्संचयित करण्याची भारताची मुख्य मागणी तसेच डेमचोक जवळील सीएनएन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण, वाय जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राच्या पलीकडे, 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या करारानुसार पूर्ण करण्यात आले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेसाठी रशियातील कझान येथे रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला या सैन्य माघारीच्या कराराची घोषणा केली. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांची राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली.
बैठकीदरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी तणाव कमी करण्यासाठी आणि सुधारित संबंधांच्या दृष्टीने पुढील टप्प्यांची रूपरेषा तयार करण्यासाठी पुन्हा संवाद सुरू करतील यावर सहमती झाली. मात्र भारत-चीन संबंध “सामान्य” करण्याच्या दिशेने टाकलेले हे केवळ एक प्रारंभिक पाऊल आहे याबद्दल अभ्यासकांचे एकमत आहे. सीमेवर तैनात असलेल्या सैन्यांमधील हिंसक संघर्ष किंवा चकमकी रोखणे हा या प्रयत्नाचा उद्देश आहे. अत्यंत संथ गतीने ही प्रक्रिया पार पडेल याचे स्वरूपाचे संकेत देत, “आम्हाला आणखी थोडा वेळ थांबावे लागेल,” अशी प्रतिक्रिया संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.
रवी शंकर


Spread the love
Previous articleLAC Disengagement ‘Almost Complete,’ Future Progress Will Require Patience: Rajnath
Next articleLebanon, Israel Could Agree To Ceasefire, Lebanese Prime Minister Says

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here