माजी पेंटॅगॉन अधिकारी मायकेल रुबिन, यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनिर यांच्या अलीकडील विधानांचा तीव्र निषेध केला आहे. Pahalgam मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधीच मुनिर यांनी केलेली ही टिप्पणी, भारताच्या विरोधातील उघड उघड चिथावणी असल्याचे रुबिन यांनी म्हटले. या हल्ल्यात किमान 26 भारतीय पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
मुनिर यांनी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपुढे दिलेल्या भाषणात, काश्मीरला पाकिस्तानची “शिरधार रक्तवाहिनी” (jugular vein) असे संबोधले होते आणि या प्रदेशाबाबत इस्लामाबादची पारंपरिक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली होती.
‘पाकिस्तानच्या शिरेवर घाव घाला’
“पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताने ‘पाकिस्तानच्या नसेवर’ घाव घालण्याची गरज आहे,” असे माजी अमेरिकन अधिकारी रुबिन, ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
रुबिन यांनी ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “मुनिर यांच्या विधानांमुळे दहशतवादाला प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे नवी दिल्लीने ठाम प्रतिसाद देणे आवश्यक आहे.”
“आसिम मुनिर यांचे भाष्य म्हणजे दहशतवादाला मोकळीक देण्यासारखे आहे. जर काश्मीर त्यांच्यासाठी शिरेचा भाग असेल, तर आता भारताने कुठलाही आडपडदा न ठेवता ती शिर तोडली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
“पाकिस्तान सातत्याने भडकावणारे विधान करून अस्थिरता निर्माण करतो आणि जागतिक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो,” अशी टीका रुबिन यांनी केली.
ISI वर प्रदेश अस्थिर करण्याचा आरोप
ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ही, काश्मीर भागात अस्थिरता निर्माण करण्यामागची वैचारिक आणि तांत्रिक प्रेरकशक्ती आहे.”
“पाकिस्तान पश्चिमी देशांना मूर्ख बनवत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रीया रुबिन यांनी दिली. ते असेही म्हणाले की, “इस्लामाबाद आता बांगलादेशातही तणाव निर्माण करत आहे आणि त्यामुळे भारताविरुद्ध एक “नवीन आघाडी” उघडत आहे.”
त्यांनी असा दावा केला की, “पहलगाम हल्ल्यामागे भौगोलिक तसेच वैचारिक आधारावर, पाकिस्तानचाच हात असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.”
JD व्हान्स यांच्या भारतदौऱ्याचे निमित्त
JD व्हान्स यांच्या भारतदौऱ्यामुळे, संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर केंद्रित होते, त्यामुळे पहलगाम हल्ल्यासाठी हीच वेळ साधली असल्याचा संशय मायकेल रुबिन यांनी व्यक्त केला आहे.
रुबिन यांच्या मते, ‘या हल्ल्याचा उद्देश जागतिक लक्ष विचलित करून नवी दिल्लीवर दबाव आणण्याचा असू शकतो.’
त्यांनी वॉशिंग्टनला आवाहन केले की, ‘पाकिस्तानच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नये आणि इस्लामाबादला जबाबदारीपासून मुक्त होऊ देऊ नये.’
जागतिक दहशतवादाशी तुलना करताना रुबिन यांनी पाहलगाम हल्ल्याची तुलना, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हमास हल्ल्याशी केली आणि पाकिस्तान समर्थित दहशतवाद किती गंभीर आहे हे अधोरेखित केले.
आपल्या भाषणात जनरल मुनिर यांनी म्हटले होते की, “आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काश्मीर आमची शिरधार रक्तवाहिनी होती, आहे आणि राहील. आम्ही हे कधी विसरणार नाही आणि आमच्या काश्मीरी भावांच्या शौर्यपूर्ण संघर्षातून आम्ही माघार घेणार नाही.”
काश्मीरवरील सार्वभौमत्व
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने, या विधानावर तत्काळ प्रत्युत्तर देत, जम्मू आणि काश्मीरवरील भारताचे सार्वभौमत्व ठामपणे अधोरेखित केले. “एका सार्वभौम देशाच्या शिरेतील भाग ‘परका’ कसा असू शकतो? हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे कब्जा केलेले भाग त्वरित रिकामे करावेत,” असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
रुबिन यांच्या विधानांमधून, अमेरिकेतील धोरणात्मक आवाजांमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेबाबत वाढती नाराजी आणि त्याचा प्रादेशिक शांतता व स्थैर्यावर होणारा परिणाम दिसून येतो.
त्यांचे भाष्य, सीमापार दहशतवाद आणि वैचारिक चिथावणूकीविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ठाम भूमिका घेण्याच्या मागणीला बळकटी देणारे आहे.