पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 26 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शुक्रवारी हिमालयीन संघीय प्रदेशातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी काश्मीरमध्ये पोहोचले.
जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरान पठारावर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणाला लष्करप्रमुख भेट देण्याची शक्यता आहे, कारण दीर्घकालीन प्रतिस्पर्धी आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानबरोबर नव्याने तणाव निर्माण झाला आहे.
लष्करप्रमुखांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या नायाब राज्यपालांची भेट
जनरल द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचीही भेट घेतली, ज्यांनी लष्करप्रमुखांना केवळ पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच नव्हे तर दहशतवादाच्या पायाभूत सुविधा आणि त्याची परिसंस्था चिरडण्याचे प्रयत्न तीव्र करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यास सांगितले.
श्रीनगर येथे झालेल्या बैठकीत सुरक्षा यंत्रणा, विविध अल्पकालीन, दीर्घकालीन उपाययोजना आणि विविध सुरक्षा संस्थांमधील एकत्रीकरण आणि समन्वयाचा आढावा घेण्यात आला.
पाकिस्तानचा सहभाग
पहलगामच्या निसर्गरम्य बैसरान पठारावर दहशतवाद्यांनी 26 जणांना गोळ्या घातल्या. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे भारताने म्हटले आहे. इस्लामाबादने मात्र आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचे नाकारले आहे.
अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी त्यानंतर एकमेकांविरुद्ध अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यात भारताने नदी पाणी वाटपाचा महत्त्वाचा सिंधू करार स्थगित ठेवला आहे तर पाकिस्तानने इतर निर्णयांबरोबरच भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुन्हेगारांचा ‘पृथ्वीच्या टोकापर्यंत’ पाठलाग करण्याचे वचन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा होत आहे.
हवाई वाहतुकीवर परिणाम
भारतातील दोन प्रमुख विमान कंपन्या इंडिगो आणि एअर इंडिया यांनी सांगितले की, पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे युनायटेड स्टेट्स आणि युरोपसह त्यांचे काही आंतरराष्ट्रीय मार्ग प्रभावित होतील, ज्यामुळे उड्डाणाच्या वेळेत वाढ होईल शिवाय विमाने इतर मार्गांवर वळवावी लागतील.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 40 भारतीय निमलष्करी पोलिस मृत्युमुखी पडले होते. त्या घटनेचा बदला म्हणून भारताने 2019 मध्ये पाकिस्तानी हद्दीत लष्करी हल्ला केला होता. आताही परत एकदा तसाच हल्ला केला जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी पाकिस्तानवर लष्करी कारवाईची मागणी केली आहे.
दोन्ही देश संपूर्ण मुस्लिमबहुल काश्मीरवर दावा करतात, परंतु त्यावर काही प्रमाणात राज्य करतात. हिंदू बहुसंख्याक देश असलेल्या भारताने बऱ्याच काळापासून इस्लामिक पाकिस्तानवर आपल्या प्रदेशात सुरक्षा दलांशी लढणाऱ्या फुटीरतावाद्यांना मदत केल्याचा आरोप केला आहे. इस्लामाबादने मात्र हे आरोप नाकारले आहेत.
हल्ल्याचे दुवे सीमापार देशात
मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे ‘सीमापार संबंध’ असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काश्मीर पोलिसांनी या हल्ल्यात सामील असलेल्या तीन लोकांची ओळख पटवणाऱ्या नोटीसमध्ये, दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचे म्हटले आहे.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक भारताच्या सर्वच भागातील होते, असे मोदी यांनी बुधवारी एका भाषणात सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)