सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरमधील निम्म्याहून अधिक पर्यटन स्थळे बंद

0

दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये गेल्या आठवड्यात पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा कडक करण्याच्या उद्देशाने सरकारी आदेशानुसार जम्मू-काश्मीरमधील निम्म्याहून अधिक पर्यटन स्थळे मंगळवारपासून जनतेसाठी बंद करण्यात आली.

पर्यटनस्थळे बंद

सरकारी दस्तऐवजानुसार, जम्मू-काश्मीर सरकारने काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळे बंद करण्याचा तर उर्वरित ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे किती काळ बंद राहतील याबद्दल कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी‌ या निर्णयावर टिप्पणी देण्याच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.

हिमालयातील उंचच उंच शिखरे, नयनरम्य दऱ्या आणि मुघल काळातील भव्य उद्याने असलेले जम्मू आणि काश्मीर हे भारताचे पर्यटन केंद्र म्हणून परत एकदा उदयाला येत होते. अलिकडच्या वर्षांत तेथील हिंसाचार कमी झाला आहे.

मात्र पहलगाम हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली असून हे पर्यटक उन्हाळ्याच्या व्यस्त हंगामाच्या सुरुवातीलाच लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

22 एप्रिल रोजी, पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन पठारावर जेव्हा दहशतवाद्यांनी तिथल्या पर्यटकांवर केलेल्या सर्वात प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात 26 पुरुषांना, मुख्यतः हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले.

यातून बचावलेल्यांनी सांगितले की बंदूकधाऱ्यांनी काही पर्यटकांना त्यांच्या धर्माविषयी विचारले आणि त्यांनी इस्लामी श्लोकांचे पठण करण्याची मागणी केली. जे यात अयशस्वी झाले किंवा ज्यांनी याला नकार दिला, त्यांच्या डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

भारताने तीनपैकी दोन हल्लेखोरांची ओळख पाकिस्तानचे ‘दहशतवादी’ अशी केली असून ते  मुस्लिमबहुल काश्मीरमध्ये हिंसक बंडखोरी करत आहेत. पाकिस्तानने या हल्ल्यात आपला हात असल्याचे नाकारत तटस्थ चौकशीची मागणी केली आहे.

भारताने पाकिस्तानवर काश्मीरमधील दहशतवादाला निधी पुरवत प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.‌काश्मीर खोरे आपले असल्याचा दोन्ही देश दावा करतात. इस्लामाबादच्या म्हणण्यानुसार ते काश्मिरी लोकांच्या आत्मनिर्णयाच्या मागणीला केवळ नैतिक आणि राजनैतिक पाठबळ देते.

या हल्ल्यानंतर अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील तणाव वाढला आहे, तसेच भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर दिल्ली आणि इस्लामाबादने एकमेकांविरुद्ध अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे-हा एक महत्त्वाचा पाणी वाटपाचा करार आहे. पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.

काश्मीरच्या भारतीय आणि पाकिस्तानी भागांना वेगळे करणाऱ्या 740 किलोमीटरच्या (460 मैल) वास्तविक सीमेवर देखील गोळीबार वाढला आहे.

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

मंगळवारी, सलग पाचव्या दिवशी, मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांवरून “अकारण” केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिल्याचे भारतीय सैन्याने सांगितले.

मात्र याबाबत कोणताही अधिक तपशील दिला गेला नाही. अर्थात यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानी लष्कराने टिप्पणी देण्याच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी सोमवारी रॉयटर्सला सांगितले की, भारताकडून लष्करी घुसखोरी अटळ आहे आणि त्यांनी याचा मुकाबला करण्यासाठी आपले सैन्य तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articlePakistan To Challenge India’s Suspension Of Indus Water Treaty
Next articlePakistan Mobilises Military and Allies Amid Escalating Tensions with India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here