मंगळवारी Pahalgam मध्ये, पर्यटकांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 28 जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमारेषेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेगवान आणि निर्णायक कारवाईचे आश्वासन दिले असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुढील काही दिवसांत “योग्य प्रत्युत्तर” देण्याचे संकेत दिले आहेत.
हा तणाव वाढत असतानाच, पाकिस्तानच्या सैनिकी हालचालींमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने (PAF) त्यांच्या काही प्रमुख युनिट्सना अलर्ट मोडवर ठेवले असून, गुप्तचर विमानांद्वारे भारतीय हवाई क्षेत्रावर लक्ष ठेवले जात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या या हलाचाली, 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या बालाकोट हवाई कारवाईपूर्वीच्या घटनांची आठवण करून देतात.
ऑनलाइन फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार, पाकिस्तानच्या C-130 विमानांची हालचाल पाकिस्तान-अधिकृत काश्मीर (PoK) भागात झाली आहे, ज्यामुळे संभाव्य लष्करी तयारी किंवा दहशतवाद्यांची हालचाल वाढवण्याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
निवृत्त नौदल वैमानिक कमांडर संदीप धवन यांनी ‘X’ वर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “पाकिस्तानचे C-130 विमान PoK मध्ये फेरफटका मारत आहेत. ही भारताचे प्रत्युत्तर रोखण्यासाठीची तयारी आहे की अधिक दहशतवाद्यांच्या तैनातीची?”
इजिप्शियन पत्रकार खालिद महमूद यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितले, “काश्मीर हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य प्रतिक्रियेमुळे जागतिक पातळीवर तणाव वाढलेला असताना, पाकिस्तानने हवाई दलाला सज्ज ठेवले आहे. आपल्या पहिल्या अधिकृत प्रतिक्रियेत पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, ‘हल्लेखोरांना माफ केले जाणार नाही’, ज्यामुळे संभाव्य लष्करी किंवा सुरक्षा कारवाईचे संकेत मिळतात.”
भारतातील माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांनी इशारा दिला आहे की, “परिस्थिती चिघळू शकते, आणि इस्लामाबादने कोणत्याही “भारतीय साहसात्मक कारवाईसाठी” तयारी केली आहे,” असे त्यांनी म्हटले.
सुरक्षा तज्ञ आणि भारताचे माजी अधिकारी जोरदार प्रत्युत्तराची मागणी करत आहेत.
जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी या हल्ल्याला “पूर्वनियोजित कारवाई” म्हणत, पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप (SSG) चा संभाव्य सहभाग असल्याचे सूचित केले. त्यांनी या हल्ल्याचे श्रेय पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या अलीकडील भडक विधानांना दिले आणि सांगितले, “आपले प्रत्युत्तर हमास हल्ल्यांनंतर इस्रायलने दिल्याप्रमाणेच असायला हवे.”
गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमध्ये 42 सक्रिय दहशतवादी लाँच पॅड्स कार्यरत आहेत, आणि अंदाजे 110–130 दहशतवादी भारतात घुसखोरीसाठी सज्ज आहेत. त्यापैकी सुमारे 115 जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे मानले जाते. यावर्षी पाकिस्तानने किमान तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी 17 घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारले असून जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या कारवायांमध्ये आणखी 26 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
दोन्ही देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असताना, परिसरात तणावपूर्ण वातावरण असून भारताच्या संभाव्य तीव्र प्रतिसादाची शक्यता वाढली आहे.
टीम भारतशक्ती