पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला उद्देशून असे म्हटले की, “आमची 130 अणवस्त्र भारताकडे लक्ष्य करुन सज्ज ठेवण्यात आलेली आहेत.” जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे दोन्ही देशात तणाव वाढला असताना, हनीफ अब्बासी यांनी केलेले हे वक्तव्य अधिकच चर्चेत आले आहे.
भारताने सिंधू नदी पाणी करार स्थगित केल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केले. हा निर्णय भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर राजकीय दबाव आणण्यासाठी घेतला आहे.
“जर भारताने आमचा पाण्याचा पुरवठा थांबवला, तर त्यांना युद्धासाठी तयार राहावे लागेल. आमच्याकडे असलेली लष्करी उपकरणे, क्षेपणास्त्रे ही शोभेसाठी नाहीत. आमची अणवस्त्र आम्ही कुठे ठेवली आहेत, याची कुणालाही कल्पना नाही. मी पुन्हा सांगतो, ही सर्व बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे भारताला टार्गेट करण्यासाठी तयार आहेत,” असे विधान अब्बासी यांनी केले.
त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिलावल भुट्टो झरदारी यांचा भारताला इशारा
पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो-झरदारी, यांनी देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, “सिंधू नदी पाकिस्तानचीच राहील, एकतर आमचे पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त,” असा धमकीवजा इशारा दिला आहे.
“मोदी जिथे जातात तिथे म्हणतात की, भारत हा हजारो वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीचा वारसदार आहे, पण तिचा खरा वारसा पाकिस्तानच्या लरकाना आणि मोहेन्जो दारोमध्ये आहे, त्याचा पुरावाही आमच्याकडे आहे. आम्हीच खरे वारसदार आहोत आणि आम्ही त्याचे रक्षण करू,” असेही झरदारी म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ला
पहलगाममधील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या, बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला केला. पर्यटकांची ओळख हिंदू असल्याची पटवून घेत, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, ज्यामध्ये बहुतेक हिंदू होते.
दहशतवाद्यांनी पीडितांना इस्लामी श्लोक म्हणायला लावले, त्यांची सुंता तपासण्यासाठी कपडे उतरवायला लावले आणि हिंदू असल्याचे निश्चित झाल्यावर गोळ्या घातल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)