पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ, यांनी सोमवारी सांगितले की, गेल्या आठवड्यात Pahalgam मध्ये पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर, शेजारील भारताकडून लष्करी घुसखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे, ज्यामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव वाढला आहे.
या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला आणि हिंदू-बहुल भारतात तीव्र संताप उसळला, तसेच मुस्लिम-बहुल पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. भारताने पाकिस्तानवर काश्मीरमध्ये दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. काश्मीरवर दोन्ही देशांनी दावा केला आहे आणि अनेकदा युद्धे लढली आहेत.
पाकिस्तान भारताच्या हल्ल्यासाठी सज्ज
“आता ही गोष्ट लवकरच होणार असल्याचे दिसत असल्यामुळे, आम्ही आमच्या लष्करी ताकदीत वाढ केली आहे. अशा परिस्थितीत काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असते आणि ते निर्णय घेण्यात आले आहेत,” असे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी इस्लामाबादमधील त्यांच्या कार्यालयात रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
आसिफ यांनी सांगितले की, “भारताच्या वक्त्यव्यांमध्ये तीव्रता वाढत आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराने सरकारला भारतीय हल्ल्याच्या शक्यतेबद्दल माहिती दिली आहे. मात्र, ही शक्यता का वाटते याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली नाही.”
भारताच्या परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयांनी यावर तत्काळ कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
मोदींची प्रतिज्ञा
Pahalgam हल्ल्यानंतर भारताने सांगितले की, ‘हल्ल्यातील दोन संशयित दहशतवादी पाकिस्तानी होते.’ मात्र पाकिस्तानने या आरोपांना फेटाळले असून, एक निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, हल्लेखोरांना शोधून काढून त्यांना शिक्षा देण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.
त्यामुळे पाकिस्तान सध्या हाय अलर्टवर आहे. “आपल्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण झाल्यास, भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर केला जाईल,” असा इशारा आसिफ यांनी दिला आहे. ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे ज्येष्ठ नेते असून भारतासोबत शांततापूर्ण चर्चा करण्याच्या भूमिकेसाठी ओळखले जातात.
मंत्र्यांनी पुढे सांगितले की, “इस्लामाबादने आखाती देश आणि चीनसह मित्र राष्ट्रांशी संपर्क साधला आहे आणि ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांनाही परिस्थितीची माहिती दिली आहे.”
“अरब आखातातील आमच्या काही मित्रांनी दोन्ही बाजूंशी चर्चा केली आहे,” असे आसिफ यांनी देशांचे नाव न घेता सांगितले.
चीनकडून शांततेचा सल्ला, ट्रम्प दूरच
चीनने सोमवारी, संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि परिस्थिती शमवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या सर्व उपायांचे स्वागत केले. दुसरीकडे, अमेरिका अद्याप हस्तक्षेप करण्यापासून दूर राहिली आहे, असं आसिफ म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी मागील आठवड्यात म्हटले की, “भारत आणि पाकिस्तान त्यांच्यातील संबंध कसे ठेवायचे हे स्वतः ठरवतील.” मात्र त्यानंतर स्टेट डिपार्टमेंटने सांगितले की, “वॉशिंग्टन दोन्ही देशांशी संपर्कात आहे आणि दोघांना घडल्या प्रकाराबाबत ‘सांमजस्याने तोडगा’ काढण्याचे आवाहन करत आहे.”
अमेरिकेने याआधीही, भारत-पाकिस्तानमधील तणाव शमवण्यासाठी भूमिका घेतली आहे. 1947 मध्ये, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजवर अनेकदा त्यांच्यात संघर्ष झाला आहे.
प्रतिसादात्मक उपाययोजना
काश्मीर हल्ल्यानंतर दिल्ली व इस्लामाबादने एकमेकांविरोधात अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारताने सिंधू जल करार निलंबित केला आहे, हा करार दोन्ही देशांमधील महत्त्वाचा जलवाटप करार आहे. तर, पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
आसिफ म्हणाले की, “पाणी तोडणे हे युद्ध करण्यासारखे कृत्य आहे आणि हा करार यापूर्वीही अनेक संघर्षांमधून टिकून राहिला असून त्याला आंतरराष्ट्रीय हमीदारांचा पाठिंबा आहे.”
“या कराराच्या बाबतीत आम्ही आधीच संबंधित क्षेत्रांशी संपर्क साधला आहे,” असे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि जागतिक बँकेला या कराराचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
नवी दिल्लीने 2008 मधील मुंबई हल्ल्यांबाबतही इस्लामाबादवर आरोप केला आहे. त्या हल्ल्यांत 166 लोकांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये अनेक परदेशी नागरिकही होते. पाकिस्तानने हे आरोप नाकारले आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)