वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, PoK अध्यक्षांची आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची मागणी

0

पाकिस्तान-व्याप्त काश्मीरचे (PoK) अध्यक्ष- सुलतान महमूद चौधरी, यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची मागणी केली आणि भारत व पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमध्ये तणाव वाढल्यास मदतकार्यासाठी तयारी सुरू असल्याचे देखील सांगितले.

पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, “भारत लवकरच पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती, त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.” हे वक्तव्य जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले.

भारताचा पाकिस्तानवर आरोप

या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यापैकी बहुतांश गैर-मुस्लिम पर्यटक होते. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले असले, तरी इस्लामाबादने हे आरोप फेटाळले आहेत.

“सध्या खूप हालचाली सुरू आहेत आणि कधीही काहीही घडू शकते, त्यामुळे आपल्याला तयार राहावे लागेल. हे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे वक्तव्य, पाकिस्तान-व्याप्त काश्मीरचे (PoK) अध्यक्ष सुलतान महमूद चौधरी यांनी Reuters ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित आंतरराष्ट्रीय राजकीय मध्यस्थीची मागणी केली.

“आम्ही यावेळी काही मैत्रीपूर्ण देशांकडून मध्यस्थीची अपेक्षा करतो आणि ती झालीच पाहिजे, अन्यथा भारत काहीही करू शकतो,” असे चौधरी म्हणाले. ‘सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती हे यात मध्यस्थी करू शकतील,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘अमेरिका आणि ब्रिटनसारखे प्रमुख देश देखील या प्रक्रियेत सहभागी होतील,’ अशी आशाही चौधरी यांनी व्यक्त केली.

नियंत्रण रेषेवरील हालचालीत वाढ

चौधरी यांनी सांगितले की, “नियंत्रण रेषेवरील (LoC) परिस्थिती “तापलेली” असून, पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारताचे दोन ड्रोन पाडले आहेत.”

“दोन्ही देशांच्या सैन्यांकडून दिवसरात्र गोळीबार सुरू आहे, मात्र सध्या तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच, त्यांनी सांगितले की, “LoC जवळ भारतीय राफेल लढाऊ विमानांच्याही हालचाली दिसून आल्या, जरी त्यांनी सीमा ओलांडली नसली तरी.”

भारतीय हवाई दलाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, एका भारतीय लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, “राफेल लढाऊ विमाने त्यांच्या नियमित सरावादरम्यान LoC परिसरात उड्डाण करत होती.”

भारत कारवाई करणार हे निश्चित

चौधरी यांनी सांगितले की, “भारत कधी, कुठे आणि कशी कारवाई करेल याची त्यांच्याकडे नेमकी माहिती नाही, पण त्यांच्या प्रशासनाने ‘रेड क्रेसेंट सोसायटी’ (Red Crescent Society) सह, अतिरिक्त वैद्यकीय मदत आणि अन्नसाठा जमवायला सुरुवात केली आहे.”

“रेड क्रेसेंट सोसायटी यावर काम करत आहे आणि आम्ही प्रभावित भागातील विस्थापित लोकांवर काम करत आहोत,” असे ते म्हणाले.

तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला काश्मीरच्या दीर्घकालीन भविष्याकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले.

“माझ्या मते, आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांसाठी ही योग्य वेळ आहे की, त्यांनी काश्मीर प्रश्नात मध्यस्थीची भूमिका घ्यावी,” असे चौधरी म्हणाले.

“खूप काळ झाला आहे आणि काश्मिरी जनतेने खूप यातना सोसल्या आहेत.”

PoK प्रशासनाचे स्वरूप

PoK मध्ये स्वतःचे निवडून आलेले सरकार आहे, मात्र तिथल्या संरक्षणासारख्या मोठ्या मुद्द्यांवर पूर्णत: पाकिस्तानचे नियंत्रण असते. येथील नागरिकांना पाकिस्तानमधील नागरी अधिकार देखील प्राप्त असतात.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनीओ गुटेरेस, यांनी मंगळवारी भारत आणि पाकिस्तानशी संवाद साधला आणि दोन्ही देशांना संघर्ष टाळण्याचे आवाहन केले. अमेरिका आणि ब्रिटननेही ‘संयम बाळगण्याचे’ आवाहन केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)


+ posts
Previous articleसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर; S-400 च्या विलंबावर चर्चा अपेक्षित
Next articleALH Dhruv Cleared for Army, Air Force Operations After Safety Review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here