भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पुढील आठवड्यात रशियाच्या ‘विजय दिन परेडमध्ये’ (Russia’s Victory Day Parade) सहभागी होण्यासाठी आणि भारतीय नौदलासाठी निर्मितीM नवीन मार्गदर्शित-क्षेपणास्त्र स्टेल्थ फ्रिगेटचे कमिशनिंग करण्यासाठी तीन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर जाणार आहेत.
या दौऱ्याचे वेळापत्रक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण रशियाकडून संरक्षण उपकरणांच्या महत्त्वाच्या पुरवठ्यांमध्ये होणाऱ्या विलंबामुळे – विशेषतः S-400 या ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणालीसह वितरणात होणाऱ्या विलंबामुळे, भारताच्या लष्करी तयारीवर परिणाम होत आहे. ही स्थिती चीन व पाकिस्तानशी संबंधित अस्थिर सुरक्षा परिस्थितीत अधिक चिंताजनक ठरत आहे.
भारताने 2018 मध्ये, $5.43 अब्ज डॉलर्सचा S-400 खरेदी करार केला होता. परंतु अंतिम दोन स्क्वॉड्रन्स आता 2026 पर्यंतच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून, वेळापत्रकाच्या तुलनेत हा खूप मोठा विलंब आहे. S-400 ही भारताच्या हवाई संरक्षण रणनीतीसाठी अत्यावश्यक प्रणाली असून, उर्वरित यंत्रणा नसल्याने नियंत्रण रेषेवरील (LAC) चीनशी आणि पाकिस्तानच्या दिशेनेही असुरक्षा निर्माण झाली आहे.
2021 पासून, तीन स्क्वॉड्रन्स भारतात तैनात करण्यात आले आहेत, परंतु अजूनही काही ऑपरेशनल गॅप्स तशाट आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे, या गॅप्स आता अधिक गंभीर झाल्या आहेत. विशेषतः सुखोई-30MKI फायटर जेट्स आणि T-90S रणगाड्यांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या पुरवठ्यावर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
“या फक्त लॉजिस्टिक समस्या नाहीत, तर ही बाब लष्करी सज्जतेवर थेट परिणाम करणारी आहे,” असे संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनेक अडचणी असूनही रशिया अद्याप भारताचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार आहे आणि एक तृतीयांश आयात याच देशाकडून होते. मात्र, भारत पश्चिमी देशांकडे आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाकडे वळत असल्याने दीर्घकालीन भागीदारीतील विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
2028 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या अण्वस्त्रचालित पाणबुडीच्या (Leased nuclear submarine) वितरणामुळे, भारताच्या सामरिक चिंतेत भर पडली आहे. विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्रात नौदलाची भूमिका वाढत आहे.
राजनाथ सिंह आपल्या दौऱ्यादरम्यान, INS Tamal या Talwar-class स्टेल्थ फ्रिगेटने जलप्रवास करणार आहेत. ही युद्धनौका 2016 च्या कराराअंतर्गत रशियामध्ये बांधण्यात आली आहे. जून 2025 च्या अखेरीपर्यंत, हे जहाज भारतीय समुद्र हद्दीत पोहोचण्याची अपेक्षा आहे. INS Tamal ही नौदलाच्या परकीय खरेदीतील शेवटची युद्धनौका असेल, त्यानंतर भारतीय नौदल संपूर्णतः स्वदेशी युद्धनौकांवर भर देणार आहे.
या दौऱ्यात राजनाथ सिंह, रशियन अधिकाऱ्यांसोबत लष्करी-तांत्रिक सहकार्याचा सखोल आढावा घेतील. यामध्ये वितरणाला गती देणे आणि विद्यमान रशियन उपकरणांसाठी देखभाल आणि पुरवठा साखळी सुधारण्यावर विशेष भर असेल. ही प्रक्रिया भारताच्या ऑपरेशनल रेडिनेससाठी अत्यंत आवश्यक मानली जात आहे.
या चर्चेला विशेष महत्त्व आहे, कारण याच वर्षी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भारतात येण्याची शक्यता आहे, तसेच BRICS शिखर परिषदही होणार आहे. चीनने आपल्या क्षेपणास्त्र आणि हवाई प्रणालीच्या आधुनिकीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना दिली असल्याने, भारतासाठी S-400 प्रणालीचे पूर्णतः समावेशन केवळ सामरिक शस्त्रास्त्र खरेदीचा मुद्दा नसून, विश्वासार्ह प्रतिबंध क्षमतेचा मूलभूत भाग आहे.
– रवि शंकर