PoKतील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन

0
PoK
4 ऑगस्ट 2022 रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) पाकिस्तानी झेंडे असलेल्या केबल कारवरील लोकांचा एक गट. (छायाचित्र सौजन्यः तल्हा हादी/अन्स्प्लॅश)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) अधिकाऱ्यांनी आपत्कालीन उपाययोजनांची मालिका सुरू केली आहे. अर्थात यामुळे नवी दिल्लीकडून लवकरच लष्करी प्रत्युत्तर दिले जाईल या अंदाजांना चालना मिळाली आहे. 

PoK चे पंतप्रधान चौधरी अनवारूल हक यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर निर्देश जारी करून नियंत्रण रेषेजवळच्या रहिवाशांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन केले.

नीलम खोऱ्यासारख्या संवेदनशील भागात पर्यटकांचा प्रवेश स्थगित करण्यात आला आहे, तर या भागातील धार्मिक विद्यापीठे बंद करण्यात आली आहेत.

आपत्कालीन प्रतिसाद निधी

आपत्कालीन उपाययोजना करण्याव्यतिरिक्त, संघर्षाच्या वेळी मदतकार्य सुलभ करण्यासाठी PoK प्रशासनाने 1 अब्ज रुपयांच्या आपत्कालीन प्रतिसाद निधीची निर्मिती करण्याचीही घोषणा केली.

नागरी संरक्षण दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि नीलम, झेलम, पूंछ, हवेली, कोटली आणि भीम्बर सारख्या नियंत्रण रेषेच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी रिकामे राहतील याची खात्री करण्यासाठी अधिकृत आणि खाजगी दोन्ही पायाभूत सुविधा पथके तैनात करण्यात आली आहेत.

अधिकाऱ्यांनी तात्काळ मदतीची गरज असलेल्या रहिवाशांसाठी बचाव हेल्पलाईन (1122) देखील सक्रिय केली आहे, तर नियंत्रण रेषेवर देखरेख वाढवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय नेत्यांकडून निर्णायक प्रत्युत्तर देण्याच्या तीव्र वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत आहेत.

नियंत्रण रेषेवरील PoK मध्ये 40 दहशतवादी तळ सक्रिय असल्याचे भारतीय गुप्तचर अहवालांवरून सूचित झाले आहे.

इतर उपाययोजना

पाकिस्तान कराची आणि लाहोरवरील आपली हवाई हद्द दररोज कित्येक तासांसाठी बंद ठेवत आहे.

PoK सरकारने या भागातील सर्व धार्मिक मदरसेही 10 दिवसांसाठी बंद केले आहेत. भारतीय हल्ल्यांमध्ये त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते अशी भीती असल्याने हे पाऊल उचलले असल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

स्थानिक पातळीवर मदरसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PoK च्या धार्मिक शिक्षणसंस्था या इस्लामी शैक्षणिक संस्था आहेत, ज्यांच्यावर तरुणांना इस्लामी अतिरेकी, कट्टरतावादी बनवल्याबद्दल टीका केली जाते.

कारवाईची मागणी

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अलीकडेच सरकारला PoK परत मिळवण्यासाठी 2016 च्या सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यांसारखी लष्करी कारवाई परत एकदा करावी असे आवाहन केल्याने निर्णायक कारवाईची मागणी भारतात वाढली आहे.

नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यात 25 पर्यटकांसह 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. भारताने या हल्ल्यातील दहशतवाद्यांना ‘अकल्पनीय शिक्षा’ देण्याचे आश्वासन दिले आहे, तर पाकिस्तानने कोणतेही ‘दुःसाहस’ करू नका असा इशारा दिला आहे.

अमेरिकेसह जागतिक समुदायाने दोन्ही देशांना आणखी तणाव वाढणे टाळावे यासाठी आवाहन केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज


+ posts
Previous articleDrones Set To Revolutionise Capabilities Of Indian Armed Forces
Next articleभारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेत क्रांती घडवून आणण्यासाठी UAS सज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here