दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कल्पनातीत किंमत मोजावी लागेल. आम्ही जगाच्या टोकापर्यंत त्यांचा पाठलाग करू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.
बिहारच्या मधुबनी येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणालेः “बिहारच्या भूमीवरून मी संपूर्ण जगाला सांगतो की भारत त्यांची ओळख पटवून प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा करेल. आम्ही पृथ्वीच्या टोकापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.”
“न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे सांगून ते म्हणाले की, संपूर्ण देश या निर्दयी हत्यांमुळे दुःखी आहे.
“पीडितांपैकी काही लोक बंगाली, काही कन्नड, काही मराठी, काही गुजराती, काही उडिया किंवा बिहारमधील काही भाषा बोलतात. काहींनी आपला भाऊ, काहींनी मुलगा, काहींनी जीवन साथीदार गमावला. पण हा हल्ला केवळ निष्पाप पर्यटकांवर नाही, तर भारताच्या आत्म्यावर आहे,” असे सांगून दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत एकजुटीने उभा आहे, असे ते म्हणाले.
“कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनात तोच राग, तेच दुःख आहे,” असे सांगत दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले असल्याचे ते म्हणाले.
ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला आणि कट पूर्णत्वाला नेला , त्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा केली जाईल. आता दहशतवादाची उरलेली काही केंद्रे नष्ट करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
“जो कोणी मानवतेवर विश्वास ठेवतो तो आमच्यासोबत आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले. या संकटाच्या काळात पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले.
भारताकडून पाकिस्तानची जलकोंडी
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या – ज्यामध्ये एका परदेशी नागरिकासह 26 हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला – त्याच्या तपासादरम्यान पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आल्यानंतर इस्लामाबादविरुद्ध केलेल्या काही कठोर उपाययोजनांचा एक भाग म्हणून भारत सरकारने बुधवारी संध्याकाळी पाकिस्तानबरोबरचा दशकांपूर्वीचा सिंधू जल करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या (CCS) बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. CCS ही राष्ट्रीय सुरक्षेबाबत निर्णय घेणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे.
CCS ला दिलेल्या ब्रीफिंगमध्ये दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले. केंद्रशासित प्रदेशात निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्याच्या आणि आर्थिक वाढ तसेच विकासाच्या दिशेने सातत्याने होत असलेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
CCS च्या बैठकीत झालेल्या निर्णयांची घोषणा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी केली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)