तिन्ही दलांच्या एकत्रिकरणाची (थिएटरायझेशन) योजना निर्णयकर्त्यांसमोर सादर करण्यासाठी तयार असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले. “आज तीनही दलांचे प्रमुख आणि सीडीएस यांच्यात एकमत आहे. आम्ही एकत्रिकरणाची एक संपूर्ण रचना आणि नियोजन तयार करू शकलो आहोत आणि आता, या टप्प्यावर, सीडीएस यांनी देखील दुजोरा दिल्याप्रमाणे, आम्हाला कसे पुढे जायचे आहे याबाबतची आमची योजना निर्णयकर्त्यांसमोर सादर करण्यास आम्ही तयार आहोत,” असे जनरल द्विवेदी म्हणाले.
नवी दिल्लीतील चाणक्य डिफेन्स डायलॉगमध्ये बोलताना लष्करप्रमुखांनी सांगितले की, अग्निपथ योजनेबद्दल ग्राउंड फीडबॅक उत्कृष्ट आहे आणि भारतीय लष्कर त्यावर खूष आहे. “अग्निपथ भरती योजनेबद्दल सांगायचे झाले तर या डिसेंबरपर्यंत आमच्याकडे एक लाख अग्निवीर असतील. ग्राउंड फीडबॅक उत्कृष्ट आहे. कमांडर यामुळे खूप आनंदी आहेत,” असे ते म्हणाले.
सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आणि अनिश्चित असल्याचे नमूद करत लष्करप्रमुखांनी चीनबरोबरच्या भारताच्या संबंधांबद्दल सविस्तर भाष्य केले. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना लष्करप्रमुख म्हणाले, “परिस्थिती स्थिर आहे, परंतु ती सामान्य नाही तर संवेदनशील आहे.” परिस्थिती एप्रिल 2020 आधीसारखी पूर्ववत करण्याच्या भारताच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. “विश्वासाला सर्वात मोठा तडा पडला आहे,” असे सांगून लष्करप्रमुखांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेली लक्षणीय घसरणदेखील अधोरेखित केली.
“जोपर्यंत चीनचा प्रश्न आहे, ते बऱ्याच काळापासून आपल्या मनात कुतूहल निर्माण करत आहेत. चीनबरोबर तुम्हाला एकाचवेळी स्पर्धा करावी लागेल, सहकार्य करावे लागेल, सहअस्तित्व कायम ठेवावे लागेल, त्यांचा सामना करावा लागेल आणि स्पर्धा करावी लागेल. परिस्थिती एप्रिल 2020 आधी प्रमाणे पूर्ववत व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र तोपर्यंत परिस्थिती संवेदनशील राहील आणि आम्ही कोणत्याही आकस्मिक परिस्थितीसाठी तयार आहोत,” असे लष्करप्रमुख म्हणाले.
जनरल द्विवेदी यांनी नमूद केले की, राजनैतिक पातळीवर पर्याय आणि शक्यता पुरवले जातात तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी दोन्ही बाजूंच्या लष्करी कमांडरनी घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असते.
डेमचोकसारख्या फ्लॅशपॉईंटच्या प्रगतीबद्दल ते म्हणाले, “उत्तरेकडील आघाडीच्या बाजूने आपण जो विचार करू शकतो ते सर्व काही टेबलवर आहे (त्यावर चर्चा सुरू आहे) त्यात डेपसांग आणि डेमचोकचा समावेश आहे.”
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील जम्मू भागात वाढलेले दहशतवादी हल्ले, मणिपूरमधील परिस्थिती आणि आत्मनिर्भरता यासह अनेक मुद्द्यांवर लष्करप्रमुखांनी भाष्य केले.
जम्मूमधील वाढलेल्या हल्ल्यांबद्दल जनरल द्विवेदी म्हणाले, “जर तुम्ही सर्व मापदंड लक्षात घेतले तर मला वाटते की आपण शांततेच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आता आलेले दहशतवादी हे परदेशी दहशतवादी आहेत.”
मणिपूरमधील प्रत्यक्ष परिस्थितीबाबत ते म्हणाले, “या परिस्थितीबाबत आख्यायिका बनल्या आहेत. आज परिस्थिती स्थिर, परंतु तणावपूर्ण आहे.”
भारतीय लष्कराच्या खरेदीचा तपशील देताना लष्करप्रमुखांनी सांगितले की 85 टक्के अधिग्रहण हे स्वदेशी आहे. निश्चित करण्यात आलेल्या यादीतील 509 वस्तूंपैकी 176 वस्तू (35 टक्के) भारतीय लष्कराने प्रायोजित केल्या आहेत. याशिवाय भारतीय उद्योगांकडून लष्कराने 1 लाख 13 हजार कोटी रुपयांच्या विविध साहित्याची खरेदी केली आहे.
रवी शंकर