अलीकडे पाहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, अमेरिकेचे संरक्षण सचिव- Pete Hegseth यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान, पीट हेगसेथ यांनी भारताप्रती सहानभूती व्यक्त करताना, भारताला स्वसंरक्षणाचा हक्क असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.
ही चर्चा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्यातील संवादानंतर झाली. या दोन्ही घडामोडींनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून वॉशिंग्टनकडे वाढलेल्या राजकीय संवादाचा परिणाम स्पष्ट केला.
राजनाथ सिंह यांच्या मते, हेगसेथ यांनी भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्याला निर्विवाद अमेरिकी पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. कारण, “अमेरिका भारतासोबत उभी आहे आणि त्याच्या स्वसंरक्षणाच्या हक्काला पाठिंबा देते,” असे हेगसेथ यांनी संवादादरम्यान सांगितले.
या चर्चेदरम्यान, सिंह यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाला चालना देणाऱ्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. “पाकिस्तानला अनेक वर्षांचा दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देण्याचा, निधी पुरवण्याचा आणि समर्थन देण्याचा इतिहास आहे. तो जगभरातील दहशतवादाला चालना देणारा आणि प्रादेशिक शांतता अस्थिर करणारा एक दुष्ट राष्ट्र म्हणून उघड झाला आहे,” असे सिंह म्हणाले. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने या कृतींविरोधात कठोर आणि स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन देखील केले.
एस. जयशंकर यांनीही पाहलगाम हल्ल्याचे दोषी, सहाय्यक आणि योजनाकार यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी जोर देऊन सांगितले की, “न्याय हा मिळायलाच हवा आणि भविष्यातील हल्ल्यांना अटकाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव सातत्याने ठेवणे आवश्यक आहे.”
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला. “इस्लामाबादने पाहलगाम हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध करावा आणि तणाव कमी करण्यासाठी भारताला सहकार्य करावे,” असे आवाहनही केले.
– टीम भारतशक्ती