अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष J.D. Vance गुरुवारी म्हणाले की, “पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी, पाकिस्तानने भारताला सहकार्य करावे, अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे.” ‘काश्मीरमध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेले उत्तर, भविष्यात व्यापक प्रादेशिक संघर्षाचे रूप घेणार नाही,’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली की
“आमची अपेक्षा आहे की, भारत या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना अशा पद्धतीने वागेल की, ज्यामुळे पुढे जाऊन प्रादेशिक संघर्ष उभा राहणार नाही,” असे व्हान्स यांनी फॉक्स न्यूजवरील ‘स्पेशल रिपोर्ट विथ ब्रेट बेयर’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
“आम्हाला ही देखील आशा आहे की, पाकिस्तानने भारताला सहकार्य करावे आणि त्यांच्या भूमीवर सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी,” असेही वॅन्स म्हणाले.
भूमिकेत बदल
22 एप्रिलचा दहशतवादी हल्ला, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्या पार्श्वभूमीवर व्हान्स यांनी केलेले हे वक्तव्य, अमेरिकेने पाकिस्तानला भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेशी जोडले जाण्याचा संकेत देण्याकरता केलेले स्पष्ट विधान आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, त्यांनी भारताच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे, मात्र पाकिस्तानवर थेट आरोप केलेला नाही.
अमेरिकेच्या दृष्टीने, भारत हा चीनच्या वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे. पाकिस्तान अद्याप अमेरिकेचा सहयोगी असला, तरी 2021 मध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर त्याचे महत्त्व कमी झाले आहे.
अलीकडच्या दिवसांत, वॉशिंग्टनने भारत आणि पाकिस्तानला एकमेकांशी संवाद साधून तणाव कमी करण्याचे आणि ‘सामंजस्याने तोडगा’ काढण्याचे आवाहन केले आहे.
भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी धरले आहे, मात्र इस्लामाबादने ही जबाबदारी नाकारली असून एका तटस्थ चौकशीची मागणी केली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या संपर्कात: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘ते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्रधारी शेजारी देशांशी विविध पातळ्यांवर संपर्कात आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी बुधवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.’
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याचा निर्धार केला आहे. याच पार्श्वभूमवीर, जयशंकर यांनी रुबिओ यांना सांगितले की, “हल्लेखोरांना न्यायालयासमोर आणणे आवश्यक आहे.” तर, पाकिस्तानने म्हटले आहे की. “भारताकडून कधीही आणि कुठेही लष्करी कारवाई होण्याची शक्यता आहे.”
बहुसंख्य मुस्लिम असलेल्या काश्मीरवर, हिंदूबहुल भारत आणि इस्लामी पाकिस्तान दोघेही पूर्ण दावा करतात, मात्र सध्या ते केवळ काश्मीरच्या काही भागांवरच नियंत्रण ठेवून आहेत आणि ज्याकरता त्यांनी अनेकदा युद्धेही लढली आहेत.
या हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला जलवाटप करणारा ‘सिंधू जलसंधी करार’ स्थगित केला आहे, तसेच दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमान सेवांसाठी आपले हवाईमार्ग बंद केले आहेत. नियंत्रण सीमारेषेवरही (LoC) दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरुच आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीच्या आधारे)