पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी सोमवारी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत, एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली. यापूर्वी रविवारी, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी, पंतप्रधान मोदी यांना हवाई दलाच्या ऑपरेशनल तयारीबाबत माहिती दिली होती. या सर्व हालचाली, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर होत आहेत, ज्या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्याच पार्श्वभूमीलर सरकार सध्या प्रत्युत्तरात्मक कारवायांच्या पर्यायांवर विचार करत आहे.
हा सुरक्षा आढावा, पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झालेल्या उच्चस्तरीय चर्चांचा एक भाग आहे. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. भारताने आधीच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यामध्ये ‘Indus Water Treaty’ (सिंधू जलकरार) स्थगित करणे आणि इस्लामाबादसोबतचे राजकीय संबंध कमी करणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC), भारत-पाकिस्तान तणावावर बंद दाराआड आपत्कालीन बैठक घेणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील LoC आठ आघाडीच्या सेक्टरमध्ये अकारण गोळीबार केला, ज्यामुळे सलग अकराव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. भारतीय लष्कराने याला योग्य प्रत्युत्तर दिले.
4 आणि 5 मे च्या रात्री, पाकिस्तान लष्कराच्या चौक्यांनी कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर या भागांमध्ये एलओसीपलीकडून अकारण लहान शस्त्रांचा वापर करत गोळीबार केला. भारतीय लष्कराने तत्काळ आणि योग्यप्रकारे प्रत्युत्तर दिले.
रविवारी या परिस्थितीवर भाष्य करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, ‘भारताच्या सुरक्षेला धोका देणाऱ्यांना तीव्र आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल,’ असे सांगितले.
“संरक्षणमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे की मी आपल्या जवानांसह देशाच्या सीमांचे रक्षण करावे आणि जो कोणी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो त्याला योग्य उत्तर द्यावे,” असे त्यांनी म्हटले.
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वगुणांचेही कौतुक केले आणि त्यांची देशहितासाठी कठोर निर्णय घेण्याची तयारी असल्याचेही सांगितले.
“पंतप्रधान मोदींच्या निर्धार आणि धैर्याची तुम्हाला कल्पना आहेच. त्यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणारे निर्णय देशवासीयांच्या इच्छेनुसारच असतील, याची मी खात्री देतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
टीम भारतशक्ती