भारताने, पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांना लक्ष्य करत राबलेल्या ‘Operation Sindoor’ चा उल्लेख, चीनकडून ‘दुर्दैवी’ अथवा ‘खेदजनक’ असा करण्यात आला आहे.
“चीनला भारताने केलेली ही लष्करी कारवाई दुर्दैवी वाटते,” असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
चीनने सांगितले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत त्याला चिंता आहे.”
“आम्हाला सद्यस्थितीबाबत चिंता वाटते. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी आहेत आणि राहतीलही आणि ते दोघेही चीनचे शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो,” असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
“दोन्ही बाजूंनी शांतता आणि स्थैर्याच्या व्यापक हितासाठी संयम बाळगावा, शांत राहावे आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, अशी आमची विनंती आहे,” असेही या निवेदनात नमूद केले आहे.
ऑपरेशन सिंदूर
भारताच्या सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुरुवात केली, ज्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील तसेच पाकिस्तानच्या पंजांबमधील, विविध ठिकाणांवरील दहशतवादी तळांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई 22 एप्रिल रोजी, पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता.
“थोड्याच वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर‘ सुरू केले आहे. या कारवाईत भारतावर हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणाऱ्या पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे,” अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने पहाटे 2 वाजल्यानंतर एका निवेदनाद्वारे जारी केली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ‘ही कारवाई भारतावर हल्ले करण्यासाठी सक्रिय असलेल्या दहशतवादी तळांना निष्क्रिय करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. यात एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.’
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही कारवाई केंद्रित, मर्यादित आणि परिस्थिती चिघळू न देणारी होती. पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांना टाळून ही कारवाई करण्यात आली.” ‘भारताने टार्गेट्सच्या निवडीत आणि कारवाईच्या पद्धतीत मोठा संयम दाखवला आहे,’ असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला
22 एप्रिल रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ बैसरनच्या कुरणांमध्ये 26 हिंदू पर्यटकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
हल्लेखोर ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या गटाचे होते, जो पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए-तोयबा’ची (LeT) एक शाखा आहे. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत आधी पर्यटकांना इस्लामी धर्मग्रंथातील कलमा म्हणायला सांगितले, तसेच त्यांची धार्मिक ओळख निश्चित करण्यासाठी पँट खाली उतरवायला लावली आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या घालून ठार मारले.
या नरसंहारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती, ज्याचा बदला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून घेतला.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या माहितीसह)