Pahalgam हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेत भीतीचे सावट

0

पहलगाममध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्याने संपूर्ण भारत तर हादरला आहेच, पण या घटनेच्या लाटांनी पाकिस्तानमधील सत्ता केंद्रांनाही हादरवून टाकले आहे. भारत देश शोकसागरात बुडालेला असताना आणि दहशतवादाविरुद्ध कठोर प्रत्युत्तराची तयारी करत असताना, पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय यंत्रणांवर अनिश्चिततेचे व अज्ञात परिणामांचे गडद सावट पसरले आहे.

पाकिस्तान आर्मी सध्या तडजोडीच्या भूमिकेत जाताना दिसते आहे. खरियान येथील 37वी आणि सियालकोटमधील 15वी इन्फंट्री डिव्हिजन यांना तातडीने पुढील सीमेवर हलवण्यात आले आहे, जे सावध संरक्षणात्मक भूमिकेचा स्पष्ट संकेत आहे. पाकिस्तानी एअर फोर्सही हाय-अलर्टवर आहे. पाकिस्तानच्या सिग्नल आणि टेक्निकल इंटेलिजन्स शाखा (SIGINT आणि TECHINT) भारताच्या हालचालींचा सातत्याने मागोवा घेत आहेत. अगदी इंडो-पाक संघर्षांमध्ये सहसा दुर्लक्षित असलेले नौदलही सध्या अलर्ट मोडवर आहे.

सीमावर्ती भागांत भीतीचं वातावरण

पाकिस्तानी लष्करी यंत्रणा जशा सज्ज होत आहेत, तसेच सीमावर्ती गावांमधून नागरिकांचे विस्थापन सुरू झाले आहे. भारताच्या अचूक व निश्‍चित प्रत्युत्तराची शक्यता लक्षात घेऊन, ही हालचाल केली जात आहे. यापूर्वी उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तराची आठवण करून देणाऱ्या, पाकिस्तानच्या या हालचालींना यावेळी अधिक खोलवर असलेल्या असुरक्षिततेची भावना जोडलेली आहे.

“भारताने युद्ध जाहीर केलेलं नाही, तरी पाकिस्तानच्या नेत्यांना आता दोन कटू सत्यं उमगली आहेत,” असे Lt Col मनोज के. चन्नन (निवृत्त) यांनी BharatShakti ला सांगितले.

“भारताकडे आता ठोस राजकीय इच्छाशक्ती आणि निर्णायक सैन्य क्षमता आहे, जी कोणत्याही वाढीव संघर्षाची भीती न बाळगता कारवाई करू शकते. पाकिस्तान आज अत्यंत असुरक्षित स्थितीत आहे.. लष्करीदृष्ट्या तणावात, राजकीयदृष्ट्या अस्थिर आणि आर्थिकदृष्ट्या कोलमडलेलं आहे,” असे त्यांनी सांगितले.

“पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. महागाई बेछूट वाढते आहे, परकीय चलनसाठा संपत चालला आहे आणि जनतेचा संताप उसळू लागला आहे. अशावेळी कोणताही बाह्य संघर्ष पाकिस्तानला आतून पूर्णपणे तोडू शकतो,” असे परखड मत त्यांनी मांडले.

चन्नन यांच्या मते, “पाकिस्तानच्या लष्करी हालचाली व नागरी विस्थापन हे सामर्थ्याचे नव्हे, तर भीतीचे लक्षण आहे. जेव्हा लष्कर, नौदल आणि हवाईदल तिघेही एकाच वेळी अलर्ट होतात आणि नागरिक तातडीने हलवले जातात, तेव्हा हे सामर्थ्यांचे प्रदर्शन नसते, तर ही भीतीची प्रतिक्रिया असते.”

धोरणात्मक परिणाम: तीन उदयोन्मुख धोके

लेफ्टनंट कर्नल चन्नन यांनी, पाकिस्तानसाठी उद्भवणाऱ्या तीन धोरणात्मक जोखमींचा उल्लेख केला:

अंतर्गत विघटन: “सैन्यवृद्धीमुळे त्यांची अस्थिरता वाढेल, विशेषतः बलुचिस्तानसारख्या संवेदनशील भागांत.”

सुरक्षेतील उणीवा: “पूर्वेला सैन्य तैनात केल्याने पश्चिम सीमेवरील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकेल”

राजकीय गतिरोध: “जागतिक समुदायासमोर रडणारा पाकिस्तानचा खेळाचा मार्ग हरवत चालला आहे. जग दहशतवादाच्या बळींसोबत उभे आहे, त्यांना मदत करणाऱ्यांसोबत नाही.”

बालाकोटच्या अनुभावमुळे भीती

भारताची दहशतवादाविरोधाची भूमिका स्पष्ट आहे. पंतप्रधान मोदींनी पहलगाम हत्याकांडामागील दोषींना “समूळ नष्ट करणार” असल्याचे जाहीर विधान केल्याने, पाकिस्तानचे सैन्य आणि सरकार हादरले आहे.

2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्याच्या आठवणींनी, पाकिस्तानात भीतीचे वातावरण पसरले आहबे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लॉन्च पॅड्स रिकाम्या केल्या गेल्या असून, बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालयही ओस पडलेले आहे. खैबर पख्तूनख्वामध्येही प्रशिक्षण शिबिरे उध्वस्त करण्यात आली असून, वरिष्ठ दहशतवादी नेत्यांना दुसरीकडे हलवण्यात येत आहे.

प्रतिकूल हालचालींचा भाग म्हणून, पाकिस्तानी एअर फोर्सच्या विमानांचा वापर करून काही “हाय व्हॅल्यू” दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

राजकीय निराशा

लष्कराच्या पलीकडे, राजकीय नेतृत्वही तितकेच अस्वस्थ आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी, Sky News ला दिलेल्या मुलाखतीत, संवादासाठी भारताला भावनिक आवाहन केले आणि “न्यूक्लियर युद्धाच्या धोक्याची” भीती व्यक्त केली.

“जगाने काळजी केली पाहिजे,” असेही ते म्हणाले.

मात्र आंतरराष्ट्रीय भावना स्पष्ट आहे, संपूर्ण सहानुभूती हल्ल्यात बळी पडलेल्यांसोबत आहे, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांसोबत नाही.

चुकीच्या धोरणात्मक संकल्पनेचा शेवट

पाकिस्तान सध्या संघर्षासाठी सज्ज देश नाही, तर केवळ तग धरण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्र आहे. अनेक वर्षे त्यांच्या नेत्यांनी असे गृहीत धरला होते की, ते भारताला सतत उकसवू शकतात आणि त्याचे काहीच परिणाम होणार नाहीत.

मात्र पहलगामच्या घटनेने आणि त्याविरुद्ध भारताने घेतलेल्या काही ठोस निर्णयांनी, तो भ्रम पूर्णतः मोडून काढला आहे.

आज इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये जे सुरू आहे, तो केवळ राजकीय तणाव नाही, तर एका चुकीच्या संकल्पनेचा शेवट आहे. भारताच्या प्रत्युत्तराची भीती नाही, तर अनेक वर्षे वापरलेल्या आणि अयशस्वी ठरलेल्या धोरणाच्या कोसळण्याची जाणीव, खरी भीती निर्माण करत आहे.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleकाश्मीरमधील दहशतवाद्यांसाठी भारताकडून व्यापक शोधमोहीम
Next articleशांततेसाठी युक्रेनला भूभाग सोडावा लागू शकतो: कीवच्या महापौरांचे वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here