काश्मीरमधील पहलगामच्या बैसरान पठारी प्रदेशात 26 पर्यटकांच्या हत्येनंतर भारतीय सुरक्षा व्यवस्थेचा लष्करप्रमुख एकीकडे आढावा घेत असताना दुसरीकडे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीसांनी शुक्रवारी काश्मीरमधील नागरी वस्त्या आणि जंगलांमध्ये दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम राबवली.
या हल्ल्यानंतर भारतात संताप आणि दुःखाची लाट पसरली. शेजारील देश पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नवी दिल्लीनेही काश्मीरमध्ये दहशतवादाला पाकिस्तानने वित्तपुरवठा आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी भारताच्या लष्करप्रमुखांनी जम्मू – काश्मीरची राजधानी श्रीनगरला भेट दिली. मंगळवारी हल्ला झालेल्या पहलगाम या निसर्गरम्य शहरात झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळीही लष्करप्रमुखांनी भेट दिली. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा भारताचा आरोप इस्लामाबादने फेटाळून लावला आहे.
वाढता तणाव
या हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यांची तातडीने अंमलबजावणी करायला सुरुवात झाली आहे. या निर्णयांपैकी एक म्हणजे सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केल्याचे जाहीर केले.
1960 मध्ये झालेल्या या करारामुळे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे दोन्ही देशांमध्ये विभाजन झाले आणि पाण्याच्या वाटपाचे नियमन झाले.
“सिंधू नदीच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानपर्यंत पोहोचणार नाही याची आम्ही खात्री करू,” असे जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तान जलविद्युत आणि सिंचनासाठी सिंधू नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे त्याचे पाणी थांबवण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न ही “युद्धाची कृती” ठरेल असे पाकिस्तानने म्हटले आहे.
संयम राखण्याचे ट्रम्प यांचे आवाहन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. ते म्हणाले की भारत आणि पाकिस्तान आपापसातले संबंध समजून घेतील असा आपल्याला विश्वास आहे. अर्थात झालेला हा हल्ला ‘वाईट’ च होता. ते म्हणाले की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी आपले खूप जवळचे संबंध होते आणि दोन्ही देशांच्या नेत्यांना ते ओळखत होते.
विमानातून प्रवास करताना ट्रम्प म्हणाले, “ते यावर या ना त्या प्रकारे उपाय शोधून काढतील, मला याची खात्री आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात खूप तणाव आहे, पण नेहमीची बाब आहे.”
या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतीय वित्तीय बाजारांमध्ये तीव्र घसरण झाली परंतु नंतर त्यांच्यात सुधारणा होऊन ते 0.7 टक्के ते 0.9 टक्के खाली बंद झाले. भारतीय रुपया 0.20 टक्क्यांनी घसरला, तर भारताच्या 10 वर्षांच्या बेंचमार्क रोख्यांच्या उत्पन्नात चार बेसिस पॉईंटची वाढ झाली.
लष्कराचा प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुन्हेगारांचा ‘पृथ्वीच्या टोकापर्यंत’ पाठलाग करण्याचे वचन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी काश्मीरला भेट दिली.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले लोक संपूर्ण भारतातून पर्यटक म्हणून आले होते, असे मोदी म्हणाले.
भारतातील दोन प्रमुख विमान कंपन्या इंडिगो आणि एअर इंडिया यांनी सांगितले की, पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे युनायटेड स्टेट्स आणि युरोपसह त्यांचे काही आंतरराष्ट्रीय मार्ग प्रभावित होतील, ज्यामुळे उड्डाणाच्या वेळेत वाढ होईल शिवाय विमाने इतर मार्गांवर वळवावी लागतील.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 40 भारतीय निमलष्करी पोलिस मृत्युमुखी पडले होते. त्या घटनेचा बदला म्हणून भारताने 2019 मध्ये पाकिस्तानी हद्दीत लष्करी हल्ला केला होता. आताही परत एकदा तसाच हल्ला केला जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी पाकिस्तानवर लष्करी कारवाईची मागणी केली आहे.
हल्ल्याचे दुवे सीमापार देशात
मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे ‘सीमापार संबंध’ असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काश्मीर पोलिसांनी या हल्ल्यात सामील असलेल्या तीन लोकांची ओळख पटवणाऱ्या नोटीसमध्ये, दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचे म्हटले आहे.
भारतीय लष्कराने सांगितले की, दुसऱ्या एका घटनेत, जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरला (PoK) विभाजित करणाऱ्या नियंत्रण रेषेवर (LoC) तुरळक गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)