जागतिक सुरक्षा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत असताना, भारत आणि फ्रान्स यांनी ‘Milipol India 2025’ या देशांतर्गत आणि संरक्षण सुरक्षेवरील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान, दहशतवादाविरोधातील आपली धोरणात्मक भागीदारी आणि सामूहिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.
23 ते 25 एप्रिलदरम्यान पार पडणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात जागतिक संरक्षण क्षेत्रातील नेते, धोरणकर्ते आणि तज्ज्ञांनी एकत्र येऊन सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी विचारमंथन करत आहेत.
राय यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, जम्मू-काश्मीरमधील अलीकडील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि भारताचा दहशतवादाविरोधातील ठाम आणि स्थिर दृष्टिकोन पुन्हा एकदा व्यक्त केला. तसेच या काळात फ्रान्सने व्यक्त केलेल्या सहवेदना आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले.
फ्रेंच गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी फ्रान्स्वा-नोएल बुफे यांनी, भारताच्या भूमिकेचे समर्थन करत “दहशतवादाविरोधातील लढ्यात फ्रान्स भारताच्या सोबत आहे” असे ठामपणे सांगितले. त्यांनी भारत-फ्रान्स संबंधांचा “जागतिक स्तरावर अत्यावश्यक असलेले” असा केला.
फ्रान्सच्या भारतातील 10 अब्ज युरोच्या गुंतवणूकीचा उल्लेख करताना, बुफे यांनी भारतीय गुंतवणूकदारांना फ्रान्समध्ये गुंतवणुक करण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या कायम सदस्यत्वासाठी फ्रान्सच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला आणि दोन्ही देशांच्या सामायिक राजकीय व पर्यावरणीय उद्दिष्टांची आठवण करून दिली.
भारत-फ्रान्स भागीदारीला 27 वर्षे पूर्ण होत असताना, ही युती केवळ पारंपरिक संरक्षण संबंधांपर्यंत मर्यादित न राहता संशोधन, नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेकडेही झुकते आहे. राय यांनी पुढील महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख केला:
- फ्रान्समध्ये DRDO कार्यालयाचे उद्घाटन – संयुक्त संशोधनासाठी.
- आयफेल टॉवरवर UPI प्लॅटफॉर्मचे उद्घाटन – डिजिटल सहकार्याचे प्रतीक.
- पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये, भारतीय स्पेशल फोर्सेसचे K9 युनिट्स तैनात – विश्वास आणि सामरिक सहकार्याचा दाखला.
“आता आपली भागीदारी नवकल्पना, संशोधन आणि आत्मनिर्भरतेसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांमध्ये विस्तारते आहे. ही भागीदारी म्हणजे एकत्रितपणे मजबूत राष्ट्रीय संरचना उभारणे आहे,” असे राय म्हणाले.
‘Milipol India 2025’ मध्ये तंत्रज्ञान-केंद्रित देशांतर्गत सुरक्षा केंद्रस्थानी
PHD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) आणि इंटरॅड्स एक्झिबिशन्स तसेच COMEXPOSIUM, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिलिपोल इंडिया २०२५’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशांतर्गत सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय तज्ञता आणि नवोन्मेष यांचे समाकलन सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम भारत आणि फ्रान्समधील गृह व परराष्ट्र मंत्रालयांच्या पाठिंब्याने आयोजित केला जात आहे.
180 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शके आणि 5 हजारांपेक्षा जास्त सुरक्षा व्यावसायिक या कार्यक्रमात सहभागी होतील.
या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, पाळत ठेवणारी तंत्रज्ञानं, सायबर लवचिकता, आणि सामरिक उपकरणं अशा विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक उपाययोजना सादर केल्या जातील. भारत- फ्रान्स यांच्यातील सहकार्य हे जागतिक नेतृत्वाचे उदाहरण आहे आणि ‘Milipol India 2025’ हे रणनीतिक मुत्सद्देगिरी व तांत्रिक देवाणघेवाणीच्या महत्त्वाचे प्रतीक ठरणार आहे.
गृहमंत्रालयातील अतिरिक्त सचिव संजीवकुमार जिंदाल, यांनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या बदलत्या परिदृश्यावर तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की: “आमच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना भविष्यकालीन, अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज करणे ही आमची सर्वोच्च प्राधान्यता आहे.”
PHDCCI च्या संरक्षण व देशांतर्गत सुरक्षा समितीचे सह-अध्यक्ष एम. के. गुप्ता, यांनी एक मजबूत आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “भारत एक लवचिक, तंत्रज्ञानाधारित सुरक्षा इकोसिस्टीम उभारत आहे. MSME पासून जागतिक OEM पर्यंत, आपण सर्वांनी एकत्रितपणे गुंतवणूक आणि सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.”
समितीचे सह-अध्यक्ष वैभव गुप्ता, यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत ‘Milipol India 2025’ला ‘आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि देशांतर्गत सुरक्षेतील नवोन्मेषाचा मापदंड’ असे संबोधले.
‘Milipol India 2025’ हा कार्यक्रम आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि सामूहिक बांधिलकीने, सुरक्षा संबंध वाढवण्याच्या जागतिक प्रयत्नांचे सशक्त प्रतीक ठरते.
टीम भारतशक्ती