हिंदू नेत्याचे अपहरण आणि हत्येबद्दल भारताकडून बांगलादेशचा निषेध

0

बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या एका नेत्याचे अपहरण आणि हत्येबद्दल भारताने तीव्र निषेध व्यक्त केला असून, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यास सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल, यांनी या घटनेच्या निषेधार्थ ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “आम्ही बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक नेते श्री भाबेश चंद्र रॉय, यांच्या अपहरण व क्रूर हत्येबाबत दु:ख व्यक्त करतो. ही हत्या म्हणजे अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू अल्पसंख्यांकांवरील योजनाबद्ध कटाचे आणखी एक उदाहरण आहे, ज्यातील आरोपी आजही मोकाट फिरत आहेत.”

“या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि पुन्हा एकदा अंतरिम सरकारला हे स्पष्ट करतो की, कोणतेही कारण पुढे न करता आणि कुठलाही भेदभाव न करता सर्व अल्पसंख्यांकांचे, ज्यात हिंदूंचा समावेश होतो, त्यांचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

हिंदू नेत्याचे अपहरण व हत्या

बांगलादेशातील दीनाजपूर भागात एका हिंदू व्यक्तीचे, जे स्थानिक समाजाचे एक प्रमुख नेते होते, अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, ज्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी, राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर वाढलेल्या अत्याचारांचे हे आणखी एक उदाहरण आहे.

मृत व्यक्तीची ओळख भाबेश चंद्र रॉय (58) अशी करण्यात आली आहे.

रॉय हे शत्रग्राम युनियनमधील बसुदेवपूर गावाचे रहिवासी होते.

अहवालानुसार, ते बिराल विभागातील एक प्रमुख हिंदू नेते होते.

गुरुवारी रात्री पोलिसांनी त्यांचा मृतदेह सापडल्याचे सांगितले.

त्यांच्या पत्नी शांता रॉय यांनी The Daily Star वृत्तसंस्थेला सांगितले की, “भाबेश दुपारी घरी असताना, सुमारे 4.30 वाजता त्यांना एक फोन आला.”

त्यांच्या मते, आरोपींनी त्यांची उपस्थिती निश्चित करण्यासाठीच हा फोन केला होता.

त्या पुढे म्हणाल्या की, “सुमारे अर्ध्या तासाने चार पुरुष दोन मोटरसायकलवर आले आणि त्यांचे अपहरण करुन त्यांना घेऊन गेले”

The Daily Star ला दिलेल्या साक्षींमध्ये काही साक्षीदारांनी सांगितले की, “अपहरणकर्त्यांनी भाबेश यांना नराबारी गावात नेले आणि तिथे त्यांना अमानुष मारहाण केली.”

बिराल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अब्दुस सबूर, यांनी वृत्तपत्राला सांगितले की, “या घटनेबाबत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे.”

ते म्हणाले की, “पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.”

शेख हसीना यांच्या पदत्यागानंतर बांगलादेशमध्ये, विशेषत: हिंदू अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

युनुस यांचे अंतरिम सरकार अल्पसंख्यांकांवरील हल्ले कमी करण्यात अपयशी ठरले आहे.

मोदी-युनुस बैठक

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस, यांच्याशी झालेल्या पहिल्या अधिकृत भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक समुदायांच्या सुरक्षेबाबत “गंभीर चिंता” व्यक्त केल्याची माहिती मिळते.

या भेटीत मोदींनी ढाका सरकारला हिंसाचाराच्या घटनांचा गांभीर्याने तपास करण्याचे आणि जबाबदार व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

बँकॉकमध्ये झालेल्या सहाव्या BIMSTEC शिखर परिषदेच्या अनुषंगाने, ही भेट पार पडली.

मोदींनी यावेळी 2014 पासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधात झालेली प्रगती अधोरेखित करत, ही “दोन्हीकडच्या समाजांमधील आणि लोकांमधील खोल मैत्री” असल्याचे सांगितले.

‘त्यांनी समाजात तणाव निर्माण करणारी विधाने टाळावीत,’ असा इशाराही त्यांनी दिला.

युनुस यांनी अंतरिम सरकारची धुरा स्विकारल्यापासून, त्यांची आणि ही मोदींची ही पहिलीच औपचारिक भेट होती.

‘दिल्ली समर्थक’ लिडर, अशी ओळख असलेल्या शेख हसीना यांची सत्ता उलथवल्यानंतर, भारत-बांगलादेशमधील संबंध अधिकच तणावग्रस्त झाले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleमस्क यांची भारत भेटीची योजना; स्टारलिंक, टेस्ला स्पॉटलाइटमध्ये
Next articleCanada: दोन गटांतील गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here