भारताने पडताळणी केलेल्या ‘बेकायदेशीर स्थलांतरितांना’, बांगलादेशात परत पाठवण्याची कारवाई तीव्र केली आहे, मात्र ही कारवाई अनेकवेळा मनमानी कारभारानुसार केली जात आहे, असा आरोप मानवी हक्क गटाच्या ((ह्युमन राईट्स ग्रुप) कार्यकर्त्यांनी केला आहे.
मे महिन्यापासून आजपर्यंत, ईशान्य भारतातील आसाम राज्याने 30,000 लोकांना परप्रांतीय म्हणून घोषित केले असून, त्यापैकी 303 जणांना बांगलादेशात परत पाठवले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हे लोक अनेक वर्षांपासून आसाममध्ये राहत आहेत. त्यांचे कुटुंब आणि मालमत्ता याच राज्यात असून, त्यातील बहुतांश मुस्लिम वशांचे आणि मूळत: बांगलादेशशी जोडलेले आहे. ह्युमन राईट ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या मते, अशा अनेक कुटुंबांना चुकीच्या पद्धतीने परप्रांतीय घोषित केले गेले आहे आणि ते गरीब असल्यामुळे न्यायालयीन लढाई लढू शकत नाहीत.
काही कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘या मोहीमेत फक्त मुस्लिम लोकांनाच लक्ष्य केले जात आहे.’ दरम्यान, आसाम सरकारकडून यावर कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही.
परदेशी न्यायाधिकरणाची भूमिका
आसामने, बांगलादेशपासून सुमारे 260 किलोमीटर सीमेवर असलेल्या भागातून, परप्रांतीय घोषित करण्यात आलेल्यांना गेल्या महिन्यापासून बांगलादेशात परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई स्थानिक पातळीवर राजकीयदृष्ट्या लोकप्रिय ठरत आहे, कारण बंगाली भाषिक आणि स्थानिक आसामी लोकांमध्ये रोजगार आण् संसाधनांच्या मुद्द्यावरून आधीच तणाव आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी विधानसभेत सांगितले की, “परकीय व्यक्तींना बाहेर काढण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दबाव टाकला आहे. आतापर्यंत 303 जणांना परत पाठवण्यात आले असून, ही मोहीम पुढे आणखी तीव्र केली जाईल.”
अधिवक्ता आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य- अमन वदूद यांनी आरोप केला आहे की, “सरकार मनमानी करुन या लोकांना देशाबाहेर टाकत आहे. त्यामुळे सध्या त्या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.”
काहींना परत आणले गेले
सरमा यांनी स्पष्ट केले की, “खरे भारतीय नागरिक हद्दपार केले जाणार नाहीत. मात्र त्यांनी सांगितले की, परकीय घोषित करून निर्वासित करण्यात आलेल्यांपैकी चार जणांना परत भारतात आणण्यात आले आहे, कारण त्यांच्या ‘भारतीय नसल्याच्या’ निर्णयाविरोधात दाखल केलेली अपील न्यायालयात सुरू आहे.”
एक माजी सरकारी शिक्षक खैरुल इस्लाम (51), यांना 2016 मध्ये परप्रांतीय घोषित करण्यात आले होते. 23 मे रोजी, पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली आणि इतर 31 जणांसह त्यांची बांगलादेशात हाकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “रात्रीच्या अंधारात त्यांना रस्त्यावर उतरवून सीमेलगत ढकलले गेले. त्यानंतर बांगलादेशी गावकऱ्यांनी, BGBला (Border Guard Bangladesh) सीमा रेषेवर बोलावले आणि त्यांना दोन्ही देशांच्या सीमारेषेतील “नो मॅन्स लँड” मध्ये उभे केले. दिवसभर उन्हात उभे राहिल्यानंतर त्यांना एका बांगलादेशी छावणीत नेण्यात आले.”
इस्लाम यांच्या पत्नीने, आसाम पोलिसांना सांगितले की, ‘त्यांची केस अजून न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे काही दिवसांनी त्यांना परत भारतात आणले गेले. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या इतरांचे काय झाले हे त्यांना माहिती नाही.’
फक्त आसामच नव्हे, तर गुजरातच्या अहमदाबाद शहरातील पोलिसांनी सांगितले की, “त्यांनी 250 बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवली.” ‘या सर्वांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ असे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजीत रजियन यांनी सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)