वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर; संरक्षणमंत्री SCO बैठकीसाठी चीनला रवाना

0

एक महत्त्वपूर्ण मुत्सद्दी पाऊल टाकत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, या आठवड्यात ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)’ अंतर्गत उच्चस्तरीय बैठकीसाठी चीनमध्ये जाणार आहेत. 2020 च्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर, भारतीय संरक्षणमंत्र्याचा हा पहिलाच चीन दौरा असेल, जो बीजिंगसोबतच्या संबंधांची सावधगिरीने पुनर्रचना करण्याचे संकेत देईल.

ही भेट अनेक जागतिक राजकीय संघर्षांच्या पार्श्वभूमीवर होत आहे, जसे की: गलवान संघर्षानंतर सीमा तणावाचे नवे पडसाद, पश्चिम आशियातील वाढती अस्थिरता, आणि मध्य आशियात चीनचा वाढता प्रभाव.

BharatShakti ने सर्वप्रथम दिलेल्या वृत्तानुसार, राजनाथ सिंह 24–24 जून रोजी, चीनच्या किंगदाओ येथे होणाऱ्या SCO संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक, गालवान संघर्षाच्या पाचव्या वर्धापन दिनी होत आहे, ज्याला महत्त्वाचे राजकीय सूचक मानले जात आहे.

भारताने अलीकडेच, इराणवरील इस्रायली हवाई हल्ल्यांचा निषेध करणाऱ्या SCO च्या सामूहिक निवेदनाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला, ज्याचे नेतृत्व बीजिंग आणि मॉस्को करत होते. यामुळे भारताचे स्वतंत्र धोरण अधोरेखित झाले.

NSA अजित डोवाल यांची समांतर उपस्थिती या दौऱ्याचे महत्त्व अधिकच वाढवते. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात BRICS परिषदेत झालेल्या लघु संवादानंतर परस्पर संपर्क पुन्हा गती घेत आहे.

प्रतिकात्मक संदेश: संबंध सुधारण्याचे संकेत?

संरक्षणमंत्र्यांची ही भेट, कैलास मानसरोवर यात्रेच्या पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे, ज्याला प्रतिकात्मक महत्त्व दिले जाते. तरीही पूर्णपणे संबंध सामान्य होणे अजून लांब आहे, कारण LAC (लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल) वरील मुख्य मुद्द्यांचा गुंता अजूनही तसाच आहे.

भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘SCO बैठकीदरम्यान पाकिस्तानसोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही, हे भारताच्या सीमा-पार दहशतवादविरोधी भूमिकेचे ठाम प्रतीक आहे.’

त्याऐवजी, राजनाथ सिंह आणि अजित डोवाल यांचा संवाद रशिया, मध्य आशियाई देशांचे प्रतिनिधी आणि कदाचित चिनी संरक्षणमंत्री अ‍ॅडमिरल डोंग जून यांच्याशी होण्याची शक्यता आहे. हे भारताच्या मध्य आशियातील धोरणात्मक उपस्थितीचे संकेत आहेत, ज्यातून चीनच्या प्रभावाला प्रतिसंतुलन देण्याचा प्रयत्न केला जातो.

भारतासाठी मध्य आशिया का महत्त्वाचा आहे?

भारताचा SCO मधील सहभाग, केवळ चीन आणि पाकिस्तानपुरता मर्यादित नाही. मध्य आशिया हा एक अत्यंत महत्त्वाचा भौगोलिक आणि सामरिक दुवा आहे, जो दक्षिण आशिया, युरोप आणि रशियाला जोडतो.

इथे ऊर्जासंपत्तीचे मोठे साठे आहेत, आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्ग (INSTC) सारखे व्यापार मार्ग आहेत आणि दहशतवादविरोधी व कट्टरवादविरोधी सहकार्याचे मोठे क्षेत्र उपलब्ध आहे.

चीन आणि रशियाच्या वर्चस्वाला तोंड देताना, मध्य आशियाई राष्ट्रे भारताला एक स्थिर, संतुलन राखणारा भागीदार म्हणून पाहत आहेत. SCO मधील भारताचा सातत्यपूर्ण सहभाग देशाच्या सामरिक स्वायत्ततेचा पुरावा असून, तो हे सुनिश्चित करतो की, हा मंच केवळ बीजिंग-केंद्रित किंवा पाश्चिमात्यविरोधी गट बनत नाहीये.

प्रमुख अजेंडा: दहशतवाद, प्रादेशिक स्थैर्य, सीमासंबंधी मुद्दे

या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे:

  • सीमापार दहशतवाद आणि फुटीरतावादी चळवळी, विशेषतः राज्यपुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची ठाम भूमिका
  • अफगाणिस्तानमधून उद्भवणारे कट्टरवाद आणि अंमली पदार्थ तस्करीसारखे नवीन धोके
  • लष्करी सहकार्य आणि चीनसोबत LAC वरील डिसएंगेजमेंट (पदव्यत्यय) व आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या उपाययोजना
  • युक्रेन आणि गाझा येथील युद्ध, तसेच अलीकडील अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांमुळे निर्माण झालेला तणाव

भारताची SCO रणनीती: संतुलित सहभाग

SCO मध्ये भारताने नेहमीच एक संतुलित आणि स्वतंत्र भूमिका घेतली आहे. इस्रायलविरोधी निवेदनापासून दूर राहून, भारताने ब्लॉक पॉलिटिक्सऐवजी शांतता आणि संवादाला प्राधान्य दिले आहे.

राजनाथ सिंह आणि अजित डोवाल, यांच्या चीन दौर्‍यामागील नवी दिल्लीचे उद्दिष्ट स्पष्ट आहे की — SCO हा मंच क्षेत्रीय सुरक्षेसाठी एक खराखुरा बहुपक्षीय व्यासपीठ राहावा आणि तो केवळ मोठ्या शक्तींमधील स्पर्धा किंवा विचारधारेच्या लढायांसाठी मर्यादित राहू नये.

by- Huma Siddiqui


+ posts
Previous articleइराण : ट्रम्प यांचे लष्करी अधिकार नियंत्रित करण्यासाठी डेमोक्रॅट्सचा पुढाकार
Next articleIsrael And Iran Agree On Ceasefire To End 12-Day War, Trump Says

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here