पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘
ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र यामुळे गोंधळलेल्या पाकिस्तानने 8 मेच्या रात्री भारताच्या पश्चिमी सीमावर्ती भागांमधील लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच, भारताच्या हवाई यंत्रणांनी हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडला. मात्र त्यासंदर्भातील भारतीय माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या अत्यंत भडक, चुकीच्या आणि संवेदनहीन असल्याचे बघायला मिळाले.
माध्यमांमध्ये जेव्हा ड्रोनच्या हल्ल्यांची दृश्य दाखवली जात होती, त्यावेळी ते
ड्रोन नेमके पाकिस्तानकडून आलेले होते की, भारताच्या counter dronesनी त्यावर केलेला हल्ला होता हे कोणालाही माहिती नव्हते. ती माहिती केवळ आणि केवळ लष्कराकडे होती. सर्वसामान्य नागरिकांनी मात्र हातात असणाऱ्या मोबाईलमधून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले, सोशल मीडियावर ते शेअर केले, त्यावर चर्चा सुरू केली. त्यामुळे सोशल मीडियावरून प्रसारित होणारी माहिती हे खूप मोठे आव्हान सध्या लष्करासमोर असल्याचे भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांनी रणनीती या कार्यक्रमात स्पष्ट केले.
दुसरीकडे, कोणत्याही प्रकारे माहितीची सत्यासत्यता न तपासता अनेक वृत्तवाहिन्यांकडूनही ‘ब्रेकिंग न्यूज’ च्या नावाखाली अतिशयोक्तीपूर्ण बातम्यांचा भडिमार सुरू झाला. ही संघर्षपूर्ण परिस्थिती म्हणजे व्हिडीओ गेम नव्हे याचे भान प्रत्येक भारतीयाने ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “कराची बंदरावर भारताचा कब्जा”, “हवाई दलापाठोपाठ आता भारतीय नौदलाकडूनही आक्रमण”, “भारतीय रणगाडे पाकिस्तानात घुसले” या अशा बातम्या देत भारतीय मीडियाने स्टुडिओत बसून पाकिस्तानवर कब्जा केला, अशी टिपण्णीही गोखले यांनी केली.
या सगळ्या प्रकारांमुळे मीडियाची विश्वासार्हताच धोक्यात आल्याची टिप्पणी गोखले यांनी केली. वृत्तवाहिन्या आणि या वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी विश्वासार्हता का महत्त्वाची आहे, यावरही गोखले सरांनी आपले सडेतोड विचार मांडले. गेली 43 वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना आपण आपल्या गुरूंचा किंवा शिक्षकांचा कोणता सल्ला अजूनही अमलात आणतो हेदेखील त्यांनी सांगितले.
हल्ली डीप फेक नावाचे तंत्रज्ञान वापरून अनेक फेक व्हिडीओ पसरवले जात आहेत. त्यामुळे आपल्यासमोर आलेल्या प्रत्येक माहितीची, व्हिडीओची सत्यता आधी तपासून बघा आणि मगच पुढे पाठवा असेही त्यांनी सांगितले.
हल्लीच्या काळातील सामान्य नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीची कल्पना नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत कसे वागायचे, स्वतःचा बचाव कसा करायचा, कोणत्या गोष्टी टाळायच्या याबद्दलही गोखले यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. संपूर्ण ब्लॅकआउटच्या काळात तुमच्या हातात मोबाईल सुरू असेल तर, तेवढा प्रकाशही तुमच्या आणि परिसरातल्या इतर नागरिकांच्या जीवासाठी धोका निर्माण करणार ठरेल, यावर त्यांनी विशेष भर दिला.
या संघर्षाच्या काळात सामान्य नागरिकांनी माहितीची पडताळणी नक्की कशी करायची, त्यासाठी कोणते स्रोत (sources) तपासावेत, सरकारकडून आलेल्या माहितीवरच का विश्वास ठेवावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
मुळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अजूनही युद्ध सुरू झाल्याची घोषणा दोन्ही देशांनी केलेली नाही. सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला आपण संघर्ष म्हणू शकतो असे प्रतिपादन नितीन अ. गोखले यांनी केले. पाकिस्तान हा एक देश आहे. त्यांच्याकडे स्वतःचे सैन्य दल, हवाई दल आणि नौदल आहे. इतर देशांकडून आयात केलेली युद्धसामग्री आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे इस्रायलने जसा हमासवर हल्ला केला तसा भारताने पाकिस्तानवर केला पाहिजे, हे कल्पनारंजन म्हणूनच ठीक आहे. प्रत्यक्षात तसं करता येणार नाही, याची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे. हमास ही काही हजार दहशतवाद्यांची संघटना आहे तर, पाकिस्तान हे राष्ट्र आहे हा फरकही कायम लक्षात ठेवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण भाग बघा.