2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या सर्वाधिक जीवघेण्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात, लष्कर-ए-तोयबा (LeT) शी संबंधित दहशतवाद्यांनी, मंगळवारी पहलगाम (Pahalgam)मधील प्रसिद्ध बैसारन मेढोज येथे, पर्यटकांच्या गटावर गोळीबार केला, ज्यात किमान 28 लोक ठार झाल्याचे आणि अनेक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे, ज्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी एक हरियाणातील नौदल अधिकारी होते, जे नुकतेच लग्न करून कोची येथील पोस्टिंगवरून सुट्टीवर आले होते, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या शॅडो गट ‘द रेसिस्टन्स फ्रंट (TRF)’ ने या नरसंहाराची जबाबदारी स्विकारल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे.
उत्तर कमानचे लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचेंद्र कुमार, हे घटनेनंतर उदमपूरहून श्रीनगरला रवाना झाले. स्थानिक कमांडरकडून त्यांना सुरक्षेची सविस्तर माहिती दिली जात आहे.
पंतप्रधान मोदींनी सौदी दौरा लवकर संपवला
दोन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकृत डिनरला उपस्थित न राहता, आपला दौरा लवकर संपवला आणि ते बुधवारी सकाळी भारतात परतले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली असून, शहा सध्या श्रीनगरमध्ये परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
“मी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो… ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. या हल्ल्यातील बळींना नक्कीच न्याय दिला जाईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘X’ वर लिहीले की: “जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने मी अत्यंत दुःखी आहे. निष्पाप नागरिकांवर केलेला हा भ्याड आणि घृणास्पद हल्ला आहे. माझ्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.”
थरारक तपशील समोर
ज्याठिकाणी हल्ला झाला ते ‘बैसारन’ हे ठिकाण, केवळ पायी किंवा घोड्यावरून पोहोचता येणारे एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, आणि गुजरातसह अनेक राज्यांमधून आलेल्या पर्यटकांच्या गटाने सकाळी तिथे ट्रेक केला होता.
साक्षीदारांच्या सांगण्यानुसार, ‘दहशतवादी लष्करी गणवेशात आले होते आणि त्यांनी दुपारच्या सुमारास अचानक गोळीबार सुरू केला.’ बचावलेल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार, ‘गोळीबार करण्यापूर्वी त्यांनी पीडितांचे धर्म विचारले.’
या हल्ल्याच्या क्रौर्यामुळे संपूर्ण प्रदेश आणि देश हादरून गेला आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, “नागरिकांवर इतका मोठा हल्ला गेल्या काही वर्षांमध्ये झालेला नाही.” राजकीय वर्तुळातूनही तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताप्रती सहानभुती दर्शवली आहे.
“काश्मीरमधून आलेली ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. पंतप्रधान मोदी आणि भारतातील जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमच्या सद्भावना तुमच्यासोबत आहेत,” असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Truth Social द्वारे म्हटले आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स, जे सध्या भारत दौऱ्यावर आहेत, ते म्हणाले की: “उषा आणि मी पीडितांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो. दुःखात असलेल्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करत आहेत.”
गुप्तचर यंत्रणांचे निष्कर्ष: परकीय हात
गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात 4 ते 6 दहशतवादी सामील होते, त्यापैकी काही परदेशी असल्याचा संशय आहे, विशेषतः पाकिस्तानमधून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे दहशतवादी काही दिवसांपूर्वीच काश्मीर खोऱ्यात आले होते आणि 1 ते 7 एप्रिलदरम्यान, त्यांनी पहलगाममधील हॉटेल्स आणि पर्यटन स्थळांची रेकी केली होती.
सध्या सुरक्षादलांकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे आणि संपूर्ण प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे, तर काहीजण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
टीम भारतशक्ती